मुख्य सामग्रीवर वगळा

हरवलेलं गावपण अन् आठवणीतले शहर...


हरवलेलं गावपण अन् आठवणीतले शहर...


सांजेच्या प्रहरी रामाबाबा आपली बैलगाडी अन् दुधाची क्याटली घेऊन वावरातून निघाला,रस्त्यात गुरांसाठी काढून ठेवलेला हिरवा घास,मक्काची बारीक केलेली कुट्टी घेऊन तो ती बैलगाडीत टाकून तो रस्त्याला लागला. रस्त्यात सुमनबाई,शैली अन् सुमनबाईची नवी सूनबाई त्याला दिसल्या त्यांनाही त्याने बैलगाडीत बसवुन घेतले...

रस्त्यात चहूकडे बैलांच्या खुराने उडणारी धूळ,त्यात लालभडक दिसणारा मावळता सुर्य मी बघत होतो...पायी चालत असल्याने एरवी रामाबाबा माझ्यापुढे निघून गेला हुता. बोडक्या टेकडीवर भिलाबाबाच्या दावणीला असलेल्या बक्र्या म्या... म्या... करीत ओरडत होत्या,भिलाबाबा तांब्या घेऊन बकरीचं दूध काढत बसला होता,मला बघून त्यानं शीळ फुंकली अन् मला त्याच्याकडे यायला खुणावू लागला मी हातवारे करून सांगितले येतुया...

मी ठोकरा खात कसातरी भिलाबाबाच्या झोपडी पर्यंत पोचलो,अंगणात उभी केलेली खाट त्याने आडवी केली व मला बसायला लावले,मी बसलो...त्याने त्याच्या लेकीला राणुबाईला बकरीच्या दुधाची तीन कप चहा ठेवायला सांगितली अन् तो बकऱ्या बांधू लागला व मला बोलूही लागला...

मग काय छोटे सरकार आज वावराकडं आला हुतं का काय.?
नाही ओ अण्णा घरला करमत नाय मग आलो हुतो चारला सांच्या वख्ताला,म्हंटल जरा चारा पाणी करू अन् जाऊ घरी तितकंच घरात कोंडल्यावानी हुनार नाय....

तुमचं काय चाललंय आण्णा..? बकऱ्या आणल्या का नाय नव्या यंदाच्या वर्षाला..?
कसल्या बकऱ्या अन् कसल्या काय छोटे सरकार,यांनाच चारा पाणी करायला जीव जातूया अन् आजूबाजूला चारा बी नाय रायला.दूरदूर हिंडा लागायलं डोंगरात या माझ्या शान्या लेकरांना घेऊन,लेक जाती शाळेला अन् आता काय कुठला रोग आलाया मग ती पण घरला आहे.सरकार म्हणतोय घराला रहा,आता या बकर्यांना घेऊन कसा घरला राहू लेका तूच सांग...

इतक्यात राणुबाई चहा घेऊन येते...
चहा घ्या सरकार ती बोलती झाली...
अरे रानुबाई तुम्ही किती मोठ्या झाला,मागे एकदा आलो होतो तेव्हा ते लंगडी पाणी खेळत होता अंगणात अन् आता चहा करून दिला,काकू कुठं गेली हायसा राणुबाई...?
ती गेलीया सरपन आणाया शेजारच्या डोंगराला...
बरं आण्णा येऊ का,म्हणत मी त्यांना निरोप देऊन तिथून निघालो...

पाटाच्या रस्त्याने एक बाजूनं पाटामधून वाहणारं पाणी अन् एक बाजूनं येणारी,जाणारी शेतातील लोकं दिसत होती. मी चालत चालत पुढे एका पुलावर येऊन बसलो...अन् पुलाखाली असलेल्या त्या पाणकोंबड्या बघत बसलो पाण्यात,अधून मधून टीटवी टिव-टिव करत डोक्यावरून घिरट्या घालत होती. मी त्या पाण्यात बघत होतो,दूरवर पांढरे दोन-तीन बगळे पाण्यात चोच घालून,वर काढून काहीतरी शिकार घेऊन पळून जात होते...

सर्व जिथल्या तिथं चालू होते,खेडी दुपारी ओस पडलेल्या स्मशानागत भासायची,सांज ढळता-ढळता त्यांच्यात अनोखं चैतन्य निर्माण होत असे. अलीकडे या गावाबद्दल कधी विचारच केला नव्हता म्हणून काही उमगत नव्हतं,सतत जगण्याशी चाललेली स्पर्धा आणि पैसा यात स्वताला झोकन दिले होते आपण सर्वांनी....
गेला काही काळ आपल्याला पूर्वपदावर घेऊन आला आहे,त्याने पुन्हा एकदा निसर्ग शहाणा आहे दाखवून दिले होते,मी या विचारात असतांना शंकर दादाची बॉक्सर गाडी आली अन् मी तिच्यावर बसून घराकडे आलो...

रामाबाबा नेटकाच घरी पोहचला होता बैलांना गोठ्यात बांधून,वासराला दूध प्यायला सोडवुन तो गोठ्यात आवरून घेत होता. मी पारावर असलेल्या मारुतीच्या मंदिरात बसून हे सर्व बघत बसलेलो,इथेही जो तो ज्याच्या त्याच्या कामात होता...
दोन चार म्हातारे आजोबा आज शनिवार म्हणून अगरबत्ती घेऊन मारुतीरायाचे पाया पडायला आले होते,त्यांचे बघून मी पण प्रार्थना केली अन् पुन्हा तिथं बसून राहिलो. एरवी म्हातारे बाबा गप्पा मारायला माझ्या जवळ येऊन बसले अन् त्यांचा विषय चालू झाला यावर्षी माऊलीचे दर्शन भेटतं की नाही याचा...
मी अवाक झालो ....

या माउलींना मी काय सांगणार होतो,माझे आधुनिक विचार यांना रुचणारे नव्हते मी ऐकत बसलो.त्यांच्या बोलण्यात इतकं सुद्धा चुकीचं नव्हतं आईबापा सारखी असलेली विठ्ठल रखुमाई त्यांना,त्यांची असलेली त्यांच्यावरची श्रद्धा यातच सर्व होते. इतक्या वर्षापासून चालत आलेली परंपरा त्यांना मोडीत काढण्याचा त्यांचा विचार नव्हता,पण इथेही कुठेतरी कोरोना जिंकला होता,याची जाणीव पुढे त्यांचा बोलण्यातून झाली...

एरवी मंदिरात हरिपाठ कीर्तन होत नाही अन् देऊळ पण बंदच आहे. पण आतल्या देवाला बाहेरचं सर्व कळतं आहे,या भाबड्या विचाराने आम्ही त्याला प्रार्थना करीत होतो सर्व ठीक व्हावं इतकंच....
हरवलेलं गावपण अन् आठवणीतल जिवंत राहणार शहर आता स्वस्थ बसू देत नाही,लवकर सर्व ठीक होवो बस....

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...