मुख्य सामग्रीवर वगळा

हरवलेलं गावपण अन् आठवणीतले शहर...


हरवलेलं गावपण अन् आठवणीतले शहर...


सांजेच्या प्रहरी रामाबाबा आपली बैलगाडी अन् दुधाची क्याटली घेऊन वावरातून निघाला,रस्त्यात गुरांसाठी काढून ठेवलेला हिरवा घास,मक्काची बारीक केलेली कुट्टी घेऊन तो ती बैलगाडीत टाकून तो रस्त्याला लागला. रस्त्यात सुमनबाई,शैली अन् सुमनबाईची नवी सूनबाई त्याला दिसल्या त्यांनाही त्याने बैलगाडीत बसवुन घेतले...

रस्त्यात चहूकडे बैलांच्या खुराने उडणारी धूळ,त्यात लालभडक दिसणारा मावळता सुर्य मी बघत होतो...पायी चालत असल्याने एरवी रामाबाबा माझ्यापुढे निघून गेला हुता. बोडक्या टेकडीवर भिलाबाबाच्या दावणीला असलेल्या बक्र्या म्या... म्या... करीत ओरडत होत्या,भिलाबाबा तांब्या घेऊन बकरीचं दूध काढत बसला होता,मला बघून त्यानं शीळ फुंकली अन् मला त्याच्याकडे यायला खुणावू लागला मी हातवारे करून सांगितले येतुया...

मी ठोकरा खात कसातरी भिलाबाबाच्या झोपडी पर्यंत पोचलो,अंगणात उभी केलेली खाट त्याने आडवी केली व मला बसायला लावले,मी बसलो...त्याने त्याच्या लेकीला राणुबाईला बकरीच्या दुधाची तीन कप चहा ठेवायला सांगितली अन् तो बकऱ्या बांधू लागला व मला बोलूही लागला...

मग काय छोटे सरकार आज वावराकडं आला हुतं का काय.?
नाही ओ अण्णा घरला करमत नाय मग आलो हुतो चारला सांच्या वख्ताला,म्हंटल जरा चारा पाणी करू अन् जाऊ घरी तितकंच घरात कोंडल्यावानी हुनार नाय....

तुमचं काय चाललंय आण्णा..? बकऱ्या आणल्या का नाय नव्या यंदाच्या वर्षाला..?
कसल्या बकऱ्या अन् कसल्या काय छोटे सरकार,यांनाच चारा पाणी करायला जीव जातूया अन् आजूबाजूला चारा बी नाय रायला.दूरदूर हिंडा लागायलं डोंगरात या माझ्या शान्या लेकरांना घेऊन,लेक जाती शाळेला अन् आता काय कुठला रोग आलाया मग ती पण घरला आहे.सरकार म्हणतोय घराला रहा,आता या बकर्यांना घेऊन कसा घरला राहू लेका तूच सांग...

इतक्यात राणुबाई चहा घेऊन येते...
चहा घ्या सरकार ती बोलती झाली...
अरे रानुबाई तुम्ही किती मोठ्या झाला,मागे एकदा आलो होतो तेव्हा ते लंगडी पाणी खेळत होता अंगणात अन् आता चहा करून दिला,काकू कुठं गेली हायसा राणुबाई...?
ती गेलीया सरपन आणाया शेजारच्या डोंगराला...
बरं आण्णा येऊ का,म्हणत मी त्यांना निरोप देऊन तिथून निघालो...

पाटाच्या रस्त्याने एक बाजूनं पाटामधून वाहणारं पाणी अन् एक बाजूनं येणारी,जाणारी शेतातील लोकं दिसत होती. मी चालत चालत पुढे एका पुलावर येऊन बसलो...अन् पुलाखाली असलेल्या त्या पाणकोंबड्या बघत बसलो पाण्यात,अधून मधून टीटवी टिव-टिव करत डोक्यावरून घिरट्या घालत होती. मी त्या पाण्यात बघत होतो,दूरवर पांढरे दोन-तीन बगळे पाण्यात चोच घालून,वर काढून काहीतरी शिकार घेऊन पळून जात होते...

सर्व जिथल्या तिथं चालू होते,खेडी दुपारी ओस पडलेल्या स्मशानागत भासायची,सांज ढळता-ढळता त्यांच्यात अनोखं चैतन्य निर्माण होत असे. अलीकडे या गावाबद्दल कधी विचारच केला नव्हता म्हणून काही उमगत नव्हतं,सतत जगण्याशी चाललेली स्पर्धा आणि पैसा यात स्वताला झोकन दिले होते आपण सर्वांनी....
गेला काही काळ आपल्याला पूर्वपदावर घेऊन आला आहे,त्याने पुन्हा एकदा निसर्ग शहाणा आहे दाखवून दिले होते,मी या विचारात असतांना शंकर दादाची बॉक्सर गाडी आली अन् मी तिच्यावर बसून घराकडे आलो...

रामाबाबा नेटकाच घरी पोहचला होता बैलांना गोठ्यात बांधून,वासराला दूध प्यायला सोडवुन तो गोठ्यात आवरून घेत होता. मी पारावर असलेल्या मारुतीच्या मंदिरात बसून हे सर्व बघत बसलेलो,इथेही जो तो ज्याच्या त्याच्या कामात होता...
दोन चार म्हातारे आजोबा आज शनिवार म्हणून अगरबत्ती घेऊन मारुतीरायाचे पाया पडायला आले होते,त्यांचे बघून मी पण प्रार्थना केली अन् पुन्हा तिथं बसून राहिलो. एरवी म्हातारे बाबा गप्पा मारायला माझ्या जवळ येऊन बसले अन् त्यांचा विषय चालू झाला यावर्षी माऊलीचे दर्शन भेटतं की नाही याचा...
मी अवाक झालो ....

या माउलींना मी काय सांगणार होतो,माझे आधुनिक विचार यांना रुचणारे नव्हते मी ऐकत बसलो.त्यांच्या बोलण्यात इतकं सुद्धा चुकीचं नव्हतं आईबापा सारखी असलेली विठ्ठल रखुमाई त्यांना,त्यांची असलेली त्यांच्यावरची श्रद्धा यातच सर्व होते. इतक्या वर्षापासून चालत आलेली परंपरा त्यांना मोडीत काढण्याचा त्यांचा विचार नव्हता,पण इथेही कुठेतरी कोरोना जिंकला होता,याची जाणीव पुढे त्यांचा बोलण्यातून झाली...

एरवी मंदिरात हरिपाठ कीर्तन होत नाही अन् देऊळ पण बंदच आहे. पण आतल्या देवाला बाहेरचं सर्व कळतं आहे,या भाबड्या विचाराने आम्ही त्याला प्रार्थना करीत होतो सर्व ठीक व्हावं इतकंच....
हरवलेलं गावपण अन् आठवणीतल जिवंत राहणार शहर आता स्वस्थ बसू देत नाही,लवकर सर्व ठीक होवो बस....

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...