मुख्य सामग्रीवर वगळा

आठवणीतले बालपण....


खिडकीतून वळवाच्या पावसाच्या सरी पडतांना दिसायच्या,अलीकडे त्यांना खिडकीतून टिपणे हे एकच काम मी करत असायचो... घराच्या बाजूला चहूकडे लाल मातीची जमीन जिथवर नजर जाईल तिथवर दिसायची,मध्येच कुठेतरी काळ्या खडकांचा समुह समुद्रात असणाय्रा एकाकी बेटांप्रमाणे भासायचा...

पडता पाऊस या लाल मातीत शिंतोड्याच्या रुपात जाऊन उताराच्या दिशेनं वाहू लागायचा,वाहणारे सर्व पाणी परिसरात असलेल्या छोट्याश्या धरणरुपी तलावात जाऊन स्थिर होत असायचे. वळवाचाच पाऊस तो फार फार पंधरा वीस मिनिटे चालायचा अन् मग उघडुन जायचा मग उगवुन येणारं ते सप्तरंगी इंद्रधनुष्य हे सर्व डोळ्यांचे पारणं फेडणारं असायचं...

त्याला बघण्यासाठी आणि पावसाने ओल्या झालेल्या जमिनीतून येणाऱ्या सुगंधाला,खळखळ वाहणार्या पाण्याला अनुभवण्यासाठी आम्ही सर्व कॉलनीतील दहा-बारा मुलं
घरा बाहेर निघायचो...

घरातून हाफ चड्डी,फुल बाह्यांचा ड्रेस सावरत निघालो की,छोट्या छोट्या तयार झालेल्या नैसर्गिक नाल्यांमधून वाहणारे पाणी लाल चिखल,दगड,गोटे यांनी आडवत बसायचो...हे सर्व करतांना अनवाणी पायाला लागणारा मऊ चिखल खूप आनंद देऊन जायचा,भटकत भटकत धरणाच्या पाळेवरून जातांनी सभोवतालच्या परिसरातून येणारं वाहतं पाणी खूप सुंदर लालसर,पिवळट दिसायचं. जेव्हा ते या कोरड्या धरणात यायचं तेव्हा ते अनुभवायला वाट्याला येणारे क्षण आयुष्यभर आठवणीत राहतील असे असायचे...

फार-फार तर दोन तासांच्या वाहत्या पाण्यात हे छोटंसं धरण भरून जायचं,यात वळवाच्या पावसात दिसणारी पिवळी बेडुक दिसायची जी ओरडत असायची. ती वर्षभरात फक्त या पंधरा दिवसातच दिसतात असे तरी मला वाटते,कारण एरवी ती दिसत नाही...मग मित्रांमध्ये उगाच लावलेले विचारांचे तर्क ती आकाशातून पावसासोबत फक्त मोकळ्या ठिकाणी जिथून पाणी वाहून धरणात जाईल तिथे पडतात असे तर्क असत...

धरण पाळेवरून खाली उतरले की,नाल्यामध्ये वाहणारे पांढरे,लालसर फेस्कुट आलेले पाणी खूप वेळ स्थिर नजरेनं बघत जमिनीतून येणारा सुगंध अनुभवत बसायचो,तिथेच त्या थंड खडकावर मांडी घालून...

कंटाळा आला की,काही अंतरावर असलेली काळया खडकांची टेकडी बघायला निघायचं. जिथे रंगीबेरंगी छोटे छोटे दगड,घारे दगड शोधायला मजा येत असे तिकडे मोर्चा वळवला की,लागणारे काठोडी लोकांची ती झोपडीवजा घरे त्या गाय,बैल,म्हशी,त्यांचे पिल्ल दिसायची...समोर जिथवर नजर जाईल तिथवर फक्त लाल मातीचं विस्तीर्ण मैदान परक्या ग्रहावर गेल्यासारखे भास करून द्यायचे.लाल मातीतून पायांनी पाणी उडवत दूरवर दिसणाऱ्या नवोदय विद्यालयाच्या त्या पिवळ्या वॉल कंपाऊंडकडे मग वाटचाल होत असत...

त्या वॉल कंपाऊंड जवळ आले की त्यांना गाल लावून त्या भिंतीचा थंडावा अनुभवत,आतून येणाऱ्या गुलमोहराच्या फुलांचा दरवळ अनुभवत पुढे चालत राहायचं...पुढे नवोदय विद्यालयाच्या गेटवर आले की,त्या होलीबॉल खेळणाऱ्या मुला-मुलींना हाय करून पुढे निघून जायचे. मागे मात्र त्यांचे रडावलेले चेहरे बघून इतक्या आनंदात सुद्धा दुःख वाटायचे अन् मोकळीक काय असते,हे तेव्हा त्या वयात समजायचे...
पुढे चालत चालत टेकडीच्या पोटाशी असणाऱ्या खदानित डोकुन खडका आड आलेल्या काळ्या पाण्याला बघत ओरडत बसायचं. दिसणारे ठेकडीचे टोक खुणवायचं,रंगेबेरंगी दगड शोधत काळ्या खडकावर शांत बसुन पुर्ण पावसाने न्हाऊन निघालेले शहर अनुभवत बसायचं... संथपणे अंगाला झोंबत असलेला वारा अन् टेकडीवर आई वडीलांसोबत फिरायला येणारे आमच्यासारखी खूप सारी मुलं आमच्याकडे कुतूहलाने बघायची...

पुढे खूप कंटाळा आला की,टेकडीवरून पळत खाली यायचे.पुन्हा त्या नवोदयमधील मुलांना भेटायचे,त्यांना भेट म्हणून दोन-तीन घारे,पांढरे दगडं द्यायचे अन् पुन्हा बाय करून घराकडे निघायचे. दुसऱ्या रस्त्याने घराकडे यायचे हायवेवरून रस्त्यातवर असलेल्या फिल्टरवर हातपाय धुवून थोडेसे बसायचे... निलगिरीच्या झाडांचा येणारा तो सुगंध जो नेहमीच आवडता आहे तो अनुभवायला भेटत असायचा अन् घाटातून येणाऱ्या ट्रक,कंटेनर यांची वरची ताडपत्री बघत राहायचं जी एरवी वाळलेली असायची...

सुर्य अस्ताला आला की सगळे घरी जायचे,मग घरी असलेला आवडता गरम खिचडीचा बेत खरंच सुख की काय होतं हे सर्व...

#आठवणीतले_बालपणाचे_दिवस...

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...