मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - १२

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - १२

पहाट झाली अन् कोंबड्याच्या बांगेसरशी नागू उठला. अंघोळपाणी करून गावातल्या खोकल्या आईच्या देउळमध्ये अगरबत्ती लाऊन, नारळ फोडून पाय पडून आला. आज शहर जवळ करायचं होतं. खोकल्या आईच्या पाया पडून नागू येओस्तोवर गोंडाजी उठला होता. अंघोळ-पाणी करून त्यानं वऱ्हाटे, पाटे, अन् इतर सर्व मालाची गिनती केली, तो सगळा माल एकासरशी लाऊन तो पारावर बसून गाड्या येण्याची वाट बघत बसला होता.

तितक्यात रखमाजी अन् त्याचा धाकला लेऊक दोन्ही टेम्पो घेऊन झोपड्या महोरे येऊन उभे राहिले. टेम्पो वेळीच आले बघून गोंडाजी अन् नागूच्या जीवात जीव आला. गोंडाजी अन् रखमाजीचा धाकला लेऊक वऱ्हाटे, पाटे, अन् इतर सगळा माल टेम्पोत भरू लागले होते. नागू रखमाजीला घेऊन पारावर बसला व सुमनबाईला चहाचं फर्मान सोडून गप्पा मारत बसले.

गप्पा तरी काय या गधड्या धंद्यात लाज राहिली नाही, यंत्र आलीया आता कोणती बाई वऱ्हाटे, पाटे,करत बसेल. इतका वखत कुणाला हाय म्हणून तो त्याच्या धंद्यात होत असलेली आबळ रखमाजीला सांगत होता. रखमाजी त्याच्या गाड्याच्या धंद्यात महागाई अन् वाढलेली स्पर्धा, घरोघर झालेल्या गाड्या यामुळे त्याच्या धंद्यात पण कशी हाल होत आहे हे सांगत होता.

त्यांच्या गप्पा चालू होत्या अन् एकीकडे रानुबाई चुल्हीवर भाकरी थापित होती. सगळ्यांची मालक लोकं आता काही दिवस शहराला राहतील म्हणून आज जरा नियोजन बिघडले होते. गप्पा चालू असताना सुमनबाई डोक्यावर पदर घेऊन चहा घेऊन आली अन् तिने दोघांना चहा देऊन दोघांचे पाय पडले. डोक्यावरचा पदर सावरत ती आल्या पावलांनी मागे गेली.

एकीकडे संतूपण केव्हाच उठून आवरून सावरून बसला होता. त्याचा झोपडीच्या संगतीने सारा संसार शहराला जायचा होता म्हणून तो लवकरच उठून आवरासावरी करू लागला होता. त्याची घरदनीन पण सगळं साहित्य एका अंगाला लाऊन गीनती घेऊन फोडायचा उरलेला दगुड एका अंगाला लाऊन दोन-चार महिन्याला येऊन पुन्हा दगुड फोडायचं काम सुरू झालं की तो कामे येईल म्हणून त्याला नीट रचून ठेवत होती.

गोंडाजीचा सारा माल टाकून झाला तशी गाडी संतूच्या झोपडी मोहरे आली. त्याचा माल अन् बाडबिस्तरा गाडीमध्ये टाकला अन् रानुबाई, सुमनबाई, संतूची बाई यांना त्या गाडीमध्ये बसवून गाडी शहराच्या गावाला ढळली.

नागू अन् रखमाजी यांनी गप्पा आवरत्या घेत तिन्ही शिगरं टेम्पोत टाकली, त्यांना खायला काही अमुकधमुक गाडीमध्ये टाकून. झोपड्या असलेल्या पारावर नारळ फोडून जागेला निरोप देण्यात आला. उद्यापासून तिथं फक्त नागू अन् रानुबाईच झोपडीमध्ये राहणार होती. त्यामुळं त्यांची झोपडी तशीच बंद करून ते शहराला निघाले होते.

गावात आले तसं पारावर बसलेल्या संतूक आबाने नागूला हात दिला अन् काम धंद्याची विचारपुस केली. टेम्पो थांबून पुन्हा दहा-पाच मिनिट गप्पा झाल्या, गावकऱ्यांचा काही दिवसांसाठी रामराम घेऊन संतु, नागू अन् गोंडाजी आता निघाले होते. नागू अण्णाला गावात असलेला मान बघून संतू हळहळला अन् त्याच्या डोळ्यांना आसवांच्या धारा लागल्या. आपण उगीच देव माणसावर चुकीचे आरोप करत होतो याची त्याला जाणीव झाली होती. गेले दोन तीन दिवस त्याच्या अन् त्याच्या बायकोमध्ये भांडण झाले नव्हते, त्याने दारूला शिवले नव्हते म्हणून नागूपण त्याच्यावर खुश होता.

टेम्पो गावाची सडक सोडून येशीला लागला होता. आता दोन-चार महिने गोंडाजी अन् संतूला गावाचं तोंड दिसणार नव्हतं म्हणून ते पुढे होत असणाऱ्या प्रवासाच्या संगतीने मागे धूसर होत जाणाऱ्या गावाला बघत बसले होते. हळू हळू गाव मागे पडत होता सावता महाराज यांच्या मंदिरावर असलेल्या झेंडा दूरवरून त्यांना दिसू लागला होता.

आषाढी एकादशीला जसं विठ्ठलाच्या दर्शनाची भक्तांना आस लागते अन् पंढरपुरात जाताच जसं विठ्ठल रखुमाई मंदिरावरील कळस हलू लागतो तसा झेंडा हलत होता. संतू, गोंडाजी त्याकडे बघत होते. गावाने अन् गावातील गावकऱ्यांनी त्यांचा स्वभाव, कामातील प्रामाणिकपणा यामुळे त्यांना जवळ केलं होतं,रोजीरोटी दिली होती. 

त्यामुळं गावाच्या जीवावर आठ महिने ही दोन्ही कुटुंब पोट भरत होती. बाकी इतर चार महिन्यात शहराला जाऊन आपला तयार माल शहरात विकत वणवण करत भटकत होती. 

दिवस निघून जात होते, नागूसारख्या माणसांचं आयुष्य निघून जात होतं पण उभे आयुष्य पोटासाठी सुरू असणारी ही त्यांची पायपीट काही थांबत नव्हती. आज पुन्हा एकदा पोटासाठी त्यांनी शहराला जवळ केलं होतं, आता इतकं मोठं शहर त्यांना त्याच्या पोटात सामावून घेतं का..? दोन वेळची भाकर देतं का..? ही प्रश्न अनुत्तरीत राहणार होती. त्यांचं भटकत राहणं सुरू असणार होतं आयुष्याच्या शेवटापर्यंत. 

समाप्त..!

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड