मुख्य सामग्रीवर वगळा

MIT कॉर्नर अन् संगम..!

MIT कॉर्नर अन् संगम..!

जुजबी आठवणींचे दिवस होते, सूर्य उदयाला आला की मी तालुक्याच्या माझ्या गावावरून एका मोडकळीस आलेल्या फटफटीवर औरंगाबाद शहर जवळ करायचो. कारण काही नाही चांगली चालती नोकरी सोडून कॉलेज करण्याचं भूत डोक्यात शिरले होते.

शिक्षणावर पुढे चांगली नोकरी लागेल या आशेपायी मी कॉलेजच्या खेट्या घालायचो, जसं एखादी पोट पाडून आता पोर होत नाहीये म्हणून एखादी बाई दवाखान्याच्या नाहीतर मग एखाद्या देवस्थानाच्या खेट्या घालत असते.

पहाटेच शहराची वाट जवळ करायला लागलो की, थंडीच्या दिवसात अंगात हुडहुडी भरून यायची. ढवळे तलमचे असलेलं स्वेटर रस्त्यावरील धुळीने जिल्ह्याच्या शहरापर्यंत येवोस्तोवर मातकट झालेलं असायचं. केसं पार भुरके अन् त्यात धूळ गेल्यानं पिंजारल्यासारखे होऊन जायचे.

औरंगाबादला पोहचलं की, एखादा आडोसा बघून मग ते स्वेटर काढून घेणं व्हायचं. शर्ट पँटच्या आत खोचून व्हायचा, धुळीने खराब झालेले काळे बुट पुसून व्हायचं, खिळखिळी झालेली गाडी पुसून भेगा पडलेल्या हेल्मेटला सावरून घेत पुन्हा प्रवास सुरू व्हायचा.

औरंगाबाद शहरातून रेल्वे स्टेशन मार्गे १० की.मी गेलं की बीड बायपास ओलांडून ३ की.मी माझं कॉलेज होतं. दोन-अडीच वर्ष हा कॉलेज नावाचा माझ्या आयुष्यात असलेला दुष्काळ अनुभवला. यातून हाती काय लागलं..? हा प्रश्न अजूनही सुटला नाहीये पण; अजून भटकंती सुरू आहे.

या दोन-अडीच वर्षात एक व्यक्ती कायम भेटत राहिली, ओळखीची वाटत राहिली. ती म्हणजे बीड बायपासला एम.आय.टी कॉर्नरला भेटत राहणारी "संगम" नावाची तृतीयपंथी मैत्रीण. औरंगाबाद शहरात मला मिळालेली ही पहिली मैत्रीण म्हणजे संगम. ती भेटली पुढे दोन वर्ष औरंगाबाद आलो की, तिची भेट या कॉर्नरला आवर्जून व्हायची. 

कधीतरी मी निवांत असलो, ती पण निवांत असली की एम.आय.टी कॉर्नरला असलेल्या चहाच्या टपरीवर ती मला चहा पाजायची. तेव्हा एम.आय.टी अन् जवळपास महाविद्यालयात जाणारे सर्व मुलंमुली आमच्याकडे बघायची, येणारी जाणारी माणसं आमच्याकडे बघायची.

पण तिच्या सोबत गप्पा करणं, तिच्या आयुष्याचा पट तिनं मला उलगडून सांगणं हे सगळं खूप भारी वाटायचं मला. अन्; तिलाही माझा एकूण हा खुळखुळ्या झालेल्या फटफटीवर चालू असलेला माझा जीवनप्रवास भारी वाटायचा.

तर ते दिवस असे होते की, मी नव्यानं कॉलेज जायला लागलो होतो. बीड बायपास म्हणजे औरंगाबादकरांचा चर्चेचा विषय मी जोवर कॉलेज केलं तोवर हा रस्ता काही पूर्ण झाला नाही. तिथे असणारं धुळीचे साम्राज्य आता रस्ता नावाला झाला असला तरी अजूनही तसेच आहे. 

तर एकदा असंच मी माझी फटफटी घेऊन कॉर्नरला क्रॉस करण्यासाठी थांबलो होतो, समोर ट्रॅफीक पोलीस होते. माझी गाडी अन् माझी भेदरलेली अवस्था बघितली, माझा गावाकडचा लूक बघितला तर मला फाईन पक्का होता. म्हणून मी गाड्यांच्या मागे गाडी लपवत गाडी काढत होतो.

ट्रॅफीक लागली अन् तिथं संगम आली, ती लोकांकडे टाळ्या वाजवत पैसे मागत होती. तिने माझी बेचैनी हेरली. हळूहळू ट्रॅफीक ओसरली मी पोलिसांना चुकवून रस्ता क्रॉस केला अन् संगमने मला आवाज दिला.

आता रस्त्यावर ट्रॅफीक नव्हती, तो निवांत वाहत होता. ती माझ्या बाजूने दुतर्फा असलेल्या कठड्याच्या बाजूला उभी होती. तिने आवाज दिला मी तिच्याकडे गेलो. ती हसतच बोलली बहोत डरते हो पोलीससे, चुपकेसे बाईक निकाल लिये..!
मी एक न दोन हो..! म्हणून गेलो, तसं ती हसायला लागली. मग काय करतो, इकडे कुठे अश्या गप्पा झाल्या. तिने जवळच्या चहा टपरीवर मला नेले, दोघांनी सोबत चहा घेतला अन् जुजबी बोलून मी निघून गेलो. 

पुढे औरंगाबाद ईतर दुसऱ्या कामाने जरी आलो तरी संगमला भेटायचं म्हणून शहराच्या एका अंगाला असलेल्या या बीड बायपासला येणं व्हायचं. ती पण तिचा वेळ द्यायची, फार काही नाही मस्त गप्पा व्हायच्या. दोन-अडीच वर्ष मी कॉलेज आलो की या कॉर्नरला तिला भेटायचो अन् मग कॉलेजची वाट जवळ करायचो.

छान मैत्री झाली होती, पुढे शहरातल्या एकदोन मित्रांशी पण तिची भेट करून दिली. मग मी शहराला आलो की आमचं सगळ्यांचं या सिग्नलवर भेटणं व्हायचं.

माझ्यापेक्षा चार-पाच वर्षांची मोठी वाचता येईल इतकं शिकलेली, शिकण्याची इच्छा असूनही तिच्या आयुष्यात आलेली वळणं तिला रस्त्यावर घेऊन आली होती. आता तिचं हे असं जगणं नजरेसमोर होतं. ती म्हणायची,
कूछ भी हो पढाई मत छोडना..!
अन् मी पण शिकत राह्यलो.

पुढे लॉकडाऊन लागलं, कॉलेजचा संपर्क, इतर कामे मोबाईलवर होऊ लागले. तसं संगमशी होणारी भेटही दुरावत गेली. सगळं स्थिरस्थावर झाल्यावर जेव्हा दोन वर्षांनी शहरात आलो, तेव्हा पहिले या सिग्नलला आलेलो पण संगम तेव्हा भेटली नाही.

नंतर शहरात इतक्या भटकंती नंतर ती अजूनही मला शहरात दिसली नाही. लॉकडाऊन पूर्वी औरंगाबाद शहरात सिग्नलवर फार किन्नर बंधूभगिनी नव्हते. हलाखी नव्हतेच असं म्हंटले तरी चालेल. तेव्हा ही संगम एकटीच दिसायची.

अजूनही शहरात प्रत्येक सिग्नलवर सिग्नल लागला की माझी नजर तिला शोधत राहते. पण; ती नजरी पडत नाही. असंच एकदा पुण्यात एका सिग्नलवर संगम सारखीच दिसणारी एक मैत्रीण भेटली. तिला बोललो पण ती "संगम" नव्हती. खिश्यातून वीसची नोट तिच्या हातात टेकवली अन् तिला माझी कथा दोन वाक्यात सांगितली.

ती जे काही बोलली ते आयुष्यभर आयुष्य जगण्यास कारणी ठरतील अशी वाक्य होती. म्हणून ना संगमसारख्या या अश्या मैत्रिणी आयुष्यात असाव्या असं वाटून जातं.

एकदा असंच चहाचा घोट घेत घेत ती बोलली होती की, ऐसीही भटकती भटकती प्रवरा संगम की ब्रीजपर मैं आ पहुची..!  और वहा मुझे मेरी गुरू मिली, जिस्ने मुझे आशियाना दिया..! और तबसे मेरा नाम संगम है..!

बेफिकीर आयुष्य जगणारी संगम खरच बेफिकीर होती.

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड