मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ९

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ९

भर दुपार ढळून गेली, गोंडाजी अन् संतू आपलं काम उरकते घेऊन दुपारच्या जेवणाला खदानीच्या भिंती आड सावलीचा आसरा धरून बसणार होते. त्यापूर्वी त्यांनी आपल्या शिंगरांना खदानीच्या एका अंगाला असलेल्या गवताच्या रानात चरायला म्हणून खूंटी ठोकून चरायला सोडून दिले. अन् दोघे खदानीतून रीसणाऱ्या पाण्याची कॅन घेऊन जेवायला म्हणून सावलीत बसले.

आजच्याना खदानीतील कामाचा शेवट दिवस होणार होता अन् पुढे काही दिवस आता फक्त घरी राहून वह्राटे, पाटे, उखळं, देवळातले दिवे यांचा दगडांना आकार देऊन शहराला तात्पुरती झोपडी बांधून ते विक्रा करणार होते. दोघांचे जेवणं चालू होते, आता उद्यापासून त्यांच्या कामात होणारा बदल याबद्दलही ते गप्पा मारत होते. तसं यावर्षी दगुड फोडायचा हंगाम चांगलाच गावला होता त्यांना. खदान मायना भी चांगलीच मदत त्यांना केली होती अन् बराच पैका या दगडांना आकार देऊन त्यांचा होणार होता.

आजचा दिवस शेवटचा असल्यानं कामाचा बराच उरक गोंडाजी अन् संतू यांना होता. दोघांनी बिगिबिगी भाकरी खाल्या अन् पुन्हा घन आणि छनी हातोडा घेऊन ते कामाला लागले होते. उन्हाळ्याच्या दिवसातील शेवटचे दिवस उन्हं मी मी करत होती. भर उन्हात खदानीच्या भिंतीशी साळुंकी खेळत होती अन् उंच उंच आकाशात ची.. ची... करत घिरट्या घेत होती.
चातक पक्षाप्रमाणे तीला आठ-दहा दिवस पुढं असलेल्या पाऊसाचा अंदाज बांधता येत असावा म्हणून ती ओरडत असावी असं वाटून जात होतं.

हातोड्याच्या प्रत्येक घावासरशी दगडाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडत होत्या अन् त्याचा व्होलघ्याच्या आवजासारखा आवाज सर्व खदानीत दुमदुमत होता. संतू अन् गोंडाजी खेरिच दोन-चार जोड्या अजून दगुड फोडत होती, त्यांचा शेवटचा दगुड कधी फुटतो कळायला वाव नव्हता. मग एकाकीच कारखान्याला तोडीला जाणाऱ्या टोळीचा जसा पट्टा पडावा तसा पट्टा पडेल.व एकाकी खदानीतले दगड फोडायचे काम बरसदीच्या दिवसांत बंद पडल असं चक्र सुरू होतं.

एकीकडे शहराच्या गावाला डोईवर वह्राटे, पाटे विकणारी रानुबाई, सुमनबाई अन् संतूची घरची चार वाजे पोहतर आपला सारा माल विकून डोइंवर खाली चुंबळ घेऊन पावसा पाण्याचा बसस्टँड जवळ करत होती. बसस्टँड जवळ केलं अन् विकरा झालेल्या पैक्यातून लेकरांना पाच-पाच रुपयांची गोडी शेव अन् जिलेबी घेऊन त्या बसस्टँडात येऊन बसल्या. तिघींचा बराच प्रवास अन् पायपीट न होता आज सगळाच माल विकल्या गेला होता. 

तिघी बसस्टँडात असलेल्या ओट्यावर बसून गावच्या येणाऱ्या बसला बघत,घराची वाट कधी जवळ करतूया या विचारांनी बसस्टँडात घडत असलेल्या घडामोडी बघत बसल्या होत्या. आता उद्यापासून आपल्याला पहाटे मालकाची न्याहारी केली की हीच कामे असतील म्हणून त्या जरा हरखलेले चेहरे, बारीक तोंड करूनच बसून होत्या.
कारण डोईवर इतकं वजन घेऊन दिवसभर विक्रा करायचं काम सोपं नव्हतं, सांच्याला झोपडी जवळ केली की डोकं ठणका मारायचं. अंग भरून यायचं अन् गेल्या गेल्या निपचित पडून रहावे वाटायचं पण वाटलं अन् झालं तो संसार कसला. सांच्याला भाकरी, कोड्यास करणं भांडी,कुंडी करणं पार काम करता करता त्यांचा जीव रंजीस यायचा. पण; त्याला पर्याय पण काय होता आता बरसदीच्या दिवसांत तर ही आबाळ अजूनच वाढलेली अन् अजूनच त्रास ठरलेला होता.

आला दिवस कसातरी काढू म्हणून तिघी विचार करत बसची वाट बघू लागल्या होत्या.काही दहा-पाच मिनिटांच्या अंतराने बस आली अन् तिघी पटकन बसमध्ये बसून आपलं गाव जवळ करू लागल्या. दिवसभर भटकून भटकून आता अस्लाजणाऱ्या सूर्याला घेऊन त्याही अस्ताकडे जावं तसं प्रवास करत होत्या. बस एक एक गाव मागे सोडत खदाणीच्या अन् घाटाच्या पायथ्याला लागली तसं अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या संगतीने मावळत्या दिसाच्या साक्षीला तिघींनी घाटाच्या पूताक असलेल्या सोरटी सोमनाथाच्या देऊळकडे बघत बसमध्येच आपले हात जोडले अन् तिघी मनोमन काहीतरी पुटपुटत प्रार्थना करू लागल्या..!

क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...