मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ७


दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ७

गावची लोकं पण चांगली होती ,त्यांच्यात आपसात संतू अन् नागू मिसळून राहत म्हणून गावकऱ्यांना पण त्यांचा स्वभाव पटला होता. थोडाफार गावात होणारा विक्रा अन् मग तालुक्याचं शहर जवळ असल्यानं तालुक्याला माल विकायला जायचं सोयीचं होतं म्हणून त्यांची सोयच लागली होती. अन् दोनाची आता तीन संसार या दगड फोडण्याच्या कामावर गावच्या कृपेनं, गावच्या खदानीच्या कृपेनं पोट भरू लागली होती.

पहाटेचा दहाचा पार कलला तसं संतू अन् गोंडाजी आपली शिंगरं घेऊन खदानीच्या अंगाला आले. उन्हं लाहीलाही करत होते. खदानदाराने मागेच दोन दिवसाला खदानीत एक मोठा बार उडवला होता, दगडांची बरीच ठिकरं ठिकरं खदानीत चहूकडे पसरलेली होती.

खदानीच्या अंगाला मागील सालाचे अन् कालच्या पावासाचे असे पाणी तुंबलेले होते. काळ्याश्यार पाण्यात सर्वदूर हिरवे हिरवे शेवाळ नजरी पडत होते अन् काही शंभर मीटर अंतरावर असलेल्या खदानीच्या कपारीतून रीसनाऱ्या झऱ्यातून पाणी रिसत असल्याचं गोंडाजीच्या नजरीला पडलं.तो त्याच्या शिंगराच्या अंगावर असलेल्या झुलीतून कॅन घेऊन त्या रीसनाऱ्या झऱ्याच्या पायथ्याशी गेला अन् एका काटकीला कॅनीत लाऊन पाणी भरू लागला.

दहा पंधरा मिनिटांत त्याची पाचएक लिटर भराची कॅन भरली. त्यानं ती हातात धरली अन् खदानीच्या एकांगाला असलेल्या सावलीत येऊन बसला, तितक्यात संतू दोघांची शिंगरं त्यांना सावलीत चरायला म्हणून बांधून आला आणि दोघांच्या झुलीतून भाकरीचे पेंडकं घेऊन आला.

जरावेळ बसल्यावर दोघांनी पहाटेची न्याहारी करायला म्हणून फडक्यातून आपल्या भाकरी सोडल्या. संतूने कुर्डइचा भुगा,भाकर अन् गोंडाजीने भाकर अन् जाड बेसन आणि तोंडाला लावायला म्हणून लोणच्याची फोडी आणल्या होत्या. दोघांनी एकमेकांची कोड्यास घेतली अन् दोघे न्याहारी करत आज कामाला म्हणजे दगड फोडायला कुठून सुरुवात करायची हा विचार करू लागली.

वेळीच झालेला कामातील नियोजनाचा बदल म्हणून खदानीत आज दोघंच होती अन् सुमनबाई,रानुबाई अन् संतूची बाई शहराला पाटे विकायला म्हणून गेली होती. तसे खदानीत फार असा दगुड उरला नव्हता अन् बरसदीच्या दिवसात काही पैका हाताला म्हणून त्यांनी वेळीच नियोजन बदलून शहराला जाण्याचा ठरवलं होतं.

तिकडे नागू दोघांच्या झोपडीला राखण आणि उरलेल्या पाट्याला टाके देण्याचं काम तो करणार होता. शरीराने जाडजूड अन् ढेरी पुढे आल्यानं त्याला दगुड फोडायचं काम जमत नव्हतं म्हणून तो आपलं बसल्याबसल्या वऱ्हाटे, पाटे, दिवे करण्याचं काम करायचा. त्याच्या हातात ही चांगली कला होती म्हणून सभोवतालच्या चार गावातली लोकं वऱ्हाटे, पाटे, दिवे असं काही घ्यायचं म्हंटले की नागूच्या झोपडीला जवळ करायची.

नागूपण दोन-चार आणे कमी जास्त करून,आलेल्या गिऱ्हाईकचा मान ठेऊन मागेल ती जिन्नस त्याला द्यायचा.राम- श्याम करायचा जेणेकरून पुढे ते गिऱ्हाईक अजून दोन गिऱ्हाईक त्याच्या झोपडीला घेऊन येईल.

संतू अन् गोंडाजी यांनी न्याहारी झाली अन् दोघं खदानीच्या उंचउंच भिंतीला सावलीचा आडोसा धरून पाय लांबून काही अर्धा घंटा निवांत बसून बोलत राहीले. बोलण्यात विषय तरी काय दोघेही तरुण त्यामुळं दोघांना अजून हवी तेव्हढी संसाराची घडी बसवता आली नव्हती पण उद्याच्या भविष्यासाठी काय करायला हवं अन् आज इथे सगळं मोप ठीक आहे पण उद्या या खदानीला तालुक्याच्या तहसिलदार साहेबांनी सील ठोकले तर आपण कुठे जायचं ? दुसऱ्या शहरात पुन्हा हे सगळं बस्तान बसवायला होणारा त्रास, असं एकूण सगळं त्यांच्या गप्पात चालू होतं.

दोघांची शिंगर आता चरूनचरुन पार फुगून गेली होती. गोंडाजी अन् संतू आपल्या गप्पा आवरत्या घेत उठले अन् दोघांनी आपल्या शिंगरांना पाणी दाखवून आणले. पुन्हा बांधून दोघेही खदानीत ठरल्या जागी दगुड फोडायला म्हणून खांद्यावर घन घेऊन निघाले.

क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...