मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं - १०

दागडफोड्या संतू अन् नागूचं जगणं - १०

अस्ताला जाणारा सूर्य ढगांच्या आडून डोंगरांच्या रांगेपल्याड कलला. तसं संतू अन् गोंडाजी यांनी आपली वऱ्हाटे, पाटे बनवायला लागणारी जी दिवसभर घाम गाळून फोडलेली दगडं होती ती त्यांच्या खेचराच्या पाठीवर लादली. उन्हाळा सरला अन् बरसदीचा पहिला पाऊस येऊन गेला असल्यानं आता खदानीत येऊन दगुड फोडायचं त्यांचं काम आजपासून पुढे चार महिने बंद झालं होतं. 

दगुड खेचरावर लादली, मोठा घन, छनी, एक हातोडी, अन् पाण्याची कॅन त्यांनी लादलेल्या दगडाच्या बाजूला झुलीला एका पिशवीत टाकली. दोघांनी खदानमायचे गुडघ्यावर बसून हात जोडून पाया पडले. आणि दोघेही कोसभर दूर असलेल्या आपल्या झोपडीच्या दिशेनं खेचरं घेऊन निघाले.

इकडे रानुबाई, सुमनबाई अन् संतूची बाई दिवसभर वऱ्हाटे, पाटे विकून दमल्या होत्या. काहीवेळापूर्वी महामंडळाच्या बसमध्ये बसलेल्या त्या त्यांची झोपडी असलेल्या गावाच्या फाट्यावर उतरल्या. फाट्यावर असणाऱ्या भिवसन आबाच्या किराणा दुकानातून त्यांनी हळद, तिखट, मिठाच्या पुड्या अन् अर्धा अर्धा किलो तांदूळ घेऊन त्यांनी झोपड्या जवळ केल्या. आज खिचडीचा बेत ठरला असावा, हे त्यांच्या या घेतलेल्या जिनसीतून अंदाज येत होता.

इकडे दिवसभर छनी, हातोडीने वऱ्हाटे, पाटे यांना टाके पाडून थकलेला नागू, जमिनीला हात टेकवत धोतराचा पांगलेला सोंगा बांधत उभा राहिला. त्यानं सर्व अवजारे, टाके देऊन तयारी झालेली सर्व वऱ्हाटे, पाटे अन् इतर साहित्य झोपडीच्या एक अंगाला असलेल्या मोकळ्या जागेत पसरवून लावली.
जेणेकरून गावातले कुणी गिऱ्हाईक आलं तर बघून त्याला हवा तो माल तो घेईन, फार उचलपटक होणार नाही.

सर्व सोयीनं लाऊन झालं आणि फडतळात पडलेल्या, कुच्ची झालेल्या केरसुणीने झोपडी मोहरले अंगण नागू झाडू लागला होता. झाडून झालं तसं सांज सरली, सरत्या सांजेला त्यानं एका पाटावर ठेवलेल्या देव्हाऱ्यातील देवांना अगरबत्ती अन् दिवा लावला.

बाहेर अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे बघून अगरबत्ती उजव्या हाताने दोनदा गोल हलवून एकदा उलटी हलवली अन् तुळशीच्या बादलीत ती खचकन खोचून देत तो मनोमन हात जोडून देवाशी काहीतरी बोलला. सूर्याला हात जोडून त्यानं जवळच असलेल्या खाटेवर आंग टाकले.

तितक्यात दूरवरून गोंडाजी अन् संतू आपली खेचरं झोपडीच्या दिशेनं घेऊन येताना त्याच्या नजरी पडली. फाट्याच्या एका अंगाने येणाऱ्या सडकीला त्याला डोक्यावर पिशी घेतलेली रानूबाई दिसली, तिच्यापुढे संतुची बाई. नव्यानं लग्न झालेली अन् संसाराला लागलेली लाडाकोडात वाढलेली, वेंधळी, बिनफिकीर गोंडाजीची बायको सुमनबाई दिसली. ती रस्त्यानं दुतर्फा बघत चालत होती.

गावच्या हद्दीत आले तसे तिघींनी डोक्यावरचा पदर सावरलेला होताच अन् यामुळे त्या अजूनच खांदानी घराण्यातल्या, खांदानी बायका वाटत होत्या. तिघी झोपडीजवळ आल्या तसं संतूच्या बाईने उद्याच्या पहाटच्याला कोणत्या गावाला जायचं, कधी निघायचं ही विचारपूस केली व ती तिच्या झोपडीच्या दिशेनं निघून गेली. 

नागूने इस्नाला ठेवलेल्या पाण्याने रानूबाई, सुमनबाईने हातपाय धुवून वेणीफणी केली. कपाळावर आडवे कुंकू फासले अन् दोघींनी देव्हाऱ्यात पाय पडून नागूचे पाय पडले. तितक्यात गोंडाजी अन् संतू खेचर घेऊन झोपडीमोहरे आली, संतूने येतुया म्हणून हात हलवला अन् तो त्याच्या झोपडीच्या दिशेनं निघून गेला.

नागूने गोंडाजीला हातपाय धुवून यायला सांगून न्हानी घरात पाठवलं अन् त्याने खेचरावर असलेल्या दगडांना एका अंगाला लाऊन दिले. खेचराच्या अंगावर असलेली संगाची पिशवी, गोणपाटाची झुल काढून त्याला झोपडीच्या एका अंगाला बांधून दिलं. त्याला पाणी दाखवून तो खाटेवर बसून राहिला.

गोंडाजी हातपाय धुवून देव्हाऱ्यामोहरे हात जोडून पाय पडला अन् नागुचे पाय पडून तोही खाटेवर बसून दिवसभर केलेलं काम अन् उद्याचं शहर जवळ करायचं नियोजन नागूशी बोलत करु लागला होता.
उद्यापासून दगुड फोडायचं काम बरसदीच्या दिवसांत चार महिने थांबले होते. शहराला सडकीच्या बाजूने गोंडाजी अन् संतू दोघे दुकाने थाटनार होती उद्यापासून.

या विषयाला घेऊन दोघांच्या गप्पा चालू होत्या, तितक्यात सुमनबाईने दोन परातीत कोरा चहा त्यांना आणून दिला. दोघीजणी त्यांच्या पायथ्याला बसून त्यांच्या गप्पात सामील झाल्या व उद्याचं नियोजन लावायला म्हणून हातभार लाऊ लागल्या.

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड