मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं - १०

दागडफोड्या संतू अन् नागूचं जगणं - १०

अस्ताला जाणारा सूर्य ढगांच्या आडून डोंगरांच्या रांगेपल्याड कलला. तसं संतू अन् गोंडाजी यांनी आपली वऱ्हाटे, पाटे बनवायला लागणारी जी दिवसभर घाम गाळून फोडलेली दगडं होती ती त्यांच्या खेचराच्या पाठीवर लादली. उन्हाळा सरला अन् बरसदीचा पहिला पाऊस येऊन गेला असल्यानं आता खदानीत येऊन दगुड फोडायचं त्यांचं काम आजपासून पुढे चार महिने बंद झालं होतं. 

दगुड खेचरावर लादली, मोठा घन, छनी, एक हातोडी, अन् पाण्याची कॅन त्यांनी लादलेल्या दगडाच्या बाजूला झुलीला एका पिशवीत टाकली. दोघांनी खदानमायचे गुडघ्यावर बसून हात जोडून पाया पडले. आणि दोघेही कोसभर दूर असलेल्या आपल्या झोपडीच्या दिशेनं खेचरं घेऊन निघाले.

इकडे रानुबाई, सुमनबाई अन् संतूची बाई दिवसभर वऱ्हाटे, पाटे विकून दमल्या होत्या. काहीवेळापूर्वी महामंडळाच्या बसमध्ये बसलेल्या त्या त्यांची झोपडी असलेल्या गावाच्या फाट्यावर उतरल्या. फाट्यावर असणाऱ्या भिवसन आबाच्या किराणा दुकानातून त्यांनी हळद, तिखट, मिठाच्या पुड्या अन् अर्धा अर्धा किलो तांदूळ घेऊन त्यांनी झोपड्या जवळ केल्या. आज खिचडीचा बेत ठरला असावा, हे त्यांच्या या घेतलेल्या जिनसीतून अंदाज येत होता.

इकडे दिवसभर छनी, हातोडीने वऱ्हाटे, पाटे यांना टाके पाडून थकलेला नागू, जमिनीला हात टेकवत धोतराचा पांगलेला सोंगा बांधत उभा राहिला. त्यानं सर्व अवजारे, टाके देऊन तयारी झालेली सर्व वऱ्हाटे, पाटे अन् इतर साहित्य झोपडीच्या एक अंगाला असलेल्या मोकळ्या जागेत पसरवून लावली.
जेणेकरून गावातले कुणी गिऱ्हाईक आलं तर बघून त्याला हवा तो माल तो घेईन, फार उचलपटक होणार नाही.

सर्व सोयीनं लाऊन झालं आणि फडतळात पडलेल्या, कुच्ची झालेल्या केरसुणीने झोपडी मोहरले अंगण नागू झाडू लागला होता. झाडून झालं तसं सांज सरली, सरत्या सांजेला त्यानं एका पाटावर ठेवलेल्या देव्हाऱ्यातील देवांना अगरबत्ती अन् दिवा लावला.

बाहेर अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे बघून अगरबत्ती उजव्या हाताने दोनदा गोल हलवून एकदा उलटी हलवली अन् तुळशीच्या बादलीत ती खचकन खोचून देत तो मनोमन हात जोडून देवाशी काहीतरी बोलला. सूर्याला हात जोडून त्यानं जवळच असलेल्या खाटेवर आंग टाकले.

तितक्यात दूरवरून गोंडाजी अन् संतू आपली खेचरं झोपडीच्या दिशेनं घेऊन येताना त्याच्या नजरी पडली. फाट्याच्या एका अंगाने येणाऱ्या सडकीला त्याला डोक्यावर पिशी घेतलेली रानूबाई दिसली, तिच्यापुढे संतुची बाई. नव्यानं लग्न झालेली अन् संसाराला लागलेली लाडाकोडात वाढलेली, वेंधळी, बिनफिकीर गोंडाजीची बायको सुमनबाई दिसली. ती रस्त्यानं दुतर्फा बघत चालत होती.

गावच्या हद्दीत आले तसे तिघींनी डोक्यावरचा पदर सावरलेला होताच अन् यामुळे त्या अजूनच खांदानी घराण्यातल्या, खांदानी बायका वाटत होत्या. तिघी झोपडीजवळ आल्या तसं संतूच्या बाईने उद्याच्या पहाटच्याला कोणत्या गावाला जायचं, कधी निघायचं ही विचारपूस केली व ती तिच्या झोपडीच्या दिशेनं निघून गेली. 

नागूने इस्नाला ठेवलेल्या पाण्याने रानूबाई, सुमनबाईने हातपाय धुवून वेणीफणी केली. कपाळावर आडवे कुंकू फासले अन् दोघींनी देव्हाऱ्यात पाय पडून नागूचे पाय पडले. तितक्यात गोंडाजी अन् संतू खेचर घेऊन झोपडीमोहरे आली, संतूने येतुया म्हणून हात हलवला अन् तो त्याच्या झोपडीच्या दिशेनं निघून गेला.

नागूने गोंडाजीला हातपाय धुवून यायला सांगून न्हानी घरात पाठवलं अन् त्याने खेचरावर असलेल्या दगडांना एका अंगाला लाऊन दिले. खेचराच्या अंगावर असलेली संगाची पिशवी, गोणपाटाची झुल काढून त्याला झोपडीच्या एका अंगाला बांधून दिलं. त्याला पाणी दाखवून तो खाटेवर बसून राहिला.

गोंडाजी हातपाय धुवून देव्हाऱ्यामोहरे हात जोडून पाय पडला अन् नागुचे पाय पडून तोही खाटेवर बसून दिवसभर केलेलं काम अन् उद्याचं शहर जवळ करायचं नियोजन नागूशी बोलत करु लागला होता.
उद्यापासून दगुड फोडायचं काम बरसदीच्या दिवसांत चार महिने थांबले होते. शहराला सडकीच्या बाजूने गोंडाजी अन् संतू दोघे दुकाने थाटनार होती उद्यापासून.

या विषयाला घेऊन दोघांच्या गप्पा चालू होत्या, तितक्यात सुमनबाईने दोन परातीत कोरा चहा त्यांना आणून दिला. दोघीजणी त्यांच्या पायथ्याला बसून त्यांच्या गप्पात सामील झाल्या व उद्याचं नियोजन लावायला म्हणून हातभार लाऊ लागल्या.

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...