मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं - १०

दागडफोड्या संतू अन् नागूचं जगणं - १०

अस्ताला जाणारा सूर्य ढगांच्या आडून डोंगरांच्या रांगेपल्याड कलला. तसं संतू अन् गोंडाजी यांनी आपली वऱ्हाटे, पाटे बनवायला लागणारी जी दिवसभर घाम गाळून फोडलेली दगडं होती ती त्यांच्या खेचराच्या पाठीवर लादली. उन्हाळा सरला अन् बरसदीचा पहिला पाऊस येऊन गेला असल्यानं आता खदानीत येऊन दगुड फोडायचं त्यांचं काम आजपासून पुढे चार महिने बंद झालं होतं. 

दगुड खेचरावर लादली, मोठा घन, छनी, एक हातोडी, अन् पाण्याची कॅन त्यांनी लादलेल्या दगडाच्या बाजूला झुलीला एका पिशवीत टाकली. दोघांनी खदानमायचे गुडघ्यावर बसून हात जोडून पाया पडले. आणि दोघेही कोसभर दूर असलेल्या आपल्या झोपडीच्या दिशेनं खेचरं घेऊन निघाले.

इकडे रानुबाई, सुमनबाई अन् संतूची बाई दिवसभर वऱ्हाटे, पाटे विकून दमल्या होत्या. काहीवेळापूर्वी महामंडळाच्या बसमध्ये बसलेल्या त्या त्यांची झोपडी असलेल्या गावाच्या फाट्यावर उतरल्या. फाट्यावर असणाऱ्या भिवसन आबाच्या किराणा दुकानातून त्यांनी हळद, तिखट, मिठाच्या पुड्या अन् अर्धा अर्धा किलो तांदूळ घेऊन त्यांनी झोपड्या जवळ केल्या. आज खिचडीचा बेत ठरला असावा, हे त्यांच्या या घेतलेल्या जिनसीतून अंदाज येत होता.

इकडे दिवसभर छनी, हातोडीने वऱ्हाटे, पाटे यांना टाके पाडून थकलेला नागू, जमिनीला हात टेकवत धोतराचा पांगलेला सोंगा बांधत उभा राहिला. त्यानं सर्व अवजारे, टाके देऊन तयारी झालेली सर्व वऱ्हाटे, पाटे अन् इतर साहित्य झोपडीच्या एक अंगाला असलेल्या मोकळ्या जागेत पसरवून लावली.
जेणेकरून गावातले कुणी गिऱ्हाईक आलं तर बघून त्याला हवा तो माल तो घेईन, फार उचलपटक होणार नाही.

सर्व सोयीनं लाऊन झालं आणि फडतळात पडलेल्या, कुच्ची झालेल्या केरसुणीने झोपडी मोहरले अंगण नागू झाडू लागला होता. झाडून झालं तसं सांज सरली, सरत्या सांजेला त्यानं एका पाटावर ठेवलेल्या देव्हाऱ्यातील देवांना अगरबत्ती अन् दिवा लावला.

बाहेर अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे बघून अगरबत्ती उजव्या हाताने दोनदा गोल हलवून एकदा उलटी हलवली अन् तुळशीच्या बादलीत ती खचकन खोचून देत तो मनोमन हात जोडून देवाशी काहीतरी बोलला. सूर्याला हात जोडून त्यानं जवळच असलेल्या खाटेवर आंग टाकले.

तितक्यात दूरवरून गोंडाजी अन् संतू आपली खेचरं झोपडीच्या दिशेनं घेऊन येताना त्याच्या नजरी पडली. फाट्याच्या एका अंगाने येणाऱ्या सडकीला त्याला डोक्यावर पिशी घेतलेली रानूबाई दिसली, तिच्यापुढे संतुची बाई. नव्यानं लग्न झालेली अन् संसाराला लागलेली लाडाकोडात वाढलेली, वेंधळी, बिनफिकीर गोंडाजीची बायको सुमनबाई दिसली. ती रस्त्यानं दुतर्फा बघत चालत होती.

गावच्या हद्दीत आले तसे तिघींनी डोक्यावरचा पदर सावरलेला होताच अन् यामुळे त्या अजूनच खांदानी घराण्यातल्या, खांदानी बायका वाटत होत्या. तिघी झोपडीजवळ आल्या तसं संतूच्या बाईने उद्याच्या पहाटच्याला कोणत्या गावाला जायचं, कधी निघायचं ही विचारपूस केली व ती तिच्या झोपडीच्या दिशेनं निघून गेली. 

नागूने इस्नाला ठेवलेल्या पाण्याने रानूबाई, सुमनबाईने हातपाय धुवून वेणीफणी केली. कपाळावर आडवे कुंकू फासले अन् दोघींनी देव्हाऱ्यात पाय पडून नागूचे पाय पडले. तितक्यात गोंडाजी अन् संतू खेचर घेऊन झोपडीमोहरे आली, संतूने येतुया म्हणून हात हलवला अन् तो त्याच्या झोपडीच्या दिशेनं निघून गेला.

नागूने गोंडाजीला हातपाय धुवून यायला सांगून न्हानी घरात पाठवलं अन् त्याने खेचरावर असलेल्या दगडांना एका अंगाला लाऊन दिले. खेचराच्या अंगावर असलेली संगाची पिशवी, गोणपाटाची झुल काढून त्याला झोपडीच्या एका अंगाला बांधून दिलं. त्याला पाणी दाखवून तो खाटेवर बसून राहिला.

गोंडाजी हातपाय धुवून देव्हाऱ्यामोहरे हात जोडून पाय पडला अन् नागुचे पाय पडून तोही खाटेवर बसून दिवसभर केलेलं काम अन् उद्याचं शहर जवळ करायचं नियोजन नागूशी बोलत करु लागला होता.
उद्यापासून दगुड फोडायचं काम बरसदीच्या दिवसांत चार महिने थांबले होते. शहराला सडकीच्या बाजूने गोंडाजी अन् संतू दोघे दुकाने थाटनार होती उद्यापासून.

या विषयाला घेऊन दोघांच्या गप्पा चालू होत्या, तितक्यात सुमनबाईने दोन परातीत कोरा चहा त्यांना आणून दिला. दोघीजणी त्यांच्या पायथ्याला बसून त्यांच्या गप्पात सामील झाल्या व उद्याचं नियोजन लावायला म्हणून हातभार लाऊ लागल्या.

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...