मुख्य सामग्रीवर वगळा

भोग कंत्राटी कामगारांचे..!

भोग कंत्राटी कामगारांचे..!

काल सहज पडत्या पाऊसाच्या धारा वाहून डबके साचलेल्या अन् गंध्या नाल्याचं, गटरातलं संडासाचे पाणी वाहणाऱ्या गल्ल्या फिरून झाल्या. अन् मग मी सहज प्रश्न करत फिरलो लोकांना की, मी लिहत असतो म्हणजे नेमकं काय करतो रे..!

तेव्हा लोकं बोलू लागले, आमच्या काळ्याकुट्ट पडलेल्या छात्या अन् पीळ पडलेल्या आतड्यांच्या पोटाचा प्रश्न तुझ्या लेखणीतून सुटला असावा. जेव्हा खळगीभर पोटासाठी आणि मिळणाऱ्या अन्नासाठी आमची माय, आमची इज्जत आम्ही भर आंदोलनात आम्हाला आमचा हक्क मिळावा म्हणून उघडी पाडली होती. तेव्हा दंगे झाले, आमच्या लोकांचे डोके फुटले. हापश्याखाली जेव्हा डोके धुवायला घेतले, तेव्हा पाणी नाही रक्त वहायला लागलं होतं.

मग सगळं शांततेत व्हावं म्हणून माझ्या वस्तीतून मला पुढं करण्यात आलं. मी चिटुरभर कागदावर काहीतरी चार-दोन अक्षरं आई बापाची भाड खाल्यागत लिहिली, खरडली. त्याला निवेदन असं नाव दिलं. दोन-चार दिवसात आमच्या अटी मंजूर झाल्या मोठ्या साहेबानं काही अर्ज फाट्यावर निवेदनं मंजूर झालं म्हणून माझ्या सह्या घेतल्या अन् आमचीच खोलून मारावी तसं आमच्या गावाला राशनचं दुकान उघडं झालं. अन् दोनात आठ किलो गहू, दोनात चार किलो तांदूळ आम्हाला फुक्कट मिळाला.

मग पुढे अश्याच समस्या निर्माण व्हायला लागल्या, कामधंदे मिळेनासे झाले. स्टोव्हचा भडका घेऊन जसं एखादी बाई जळून जाऊ लागली. अन् जसा तिचा जनाजा घेऊन लोकं शमशनात घेऊन गेले, तेव्हा जी पब्लिक उधळलीना तितकीच मग बेकारी वाढली. चौका-चौकात रोजंदारीचा,‌रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला.

कंत्राटी कामगार, रोजंदार कंपन्यात कमी अन् बाभळीच्या फसाटीत भर दुपारी दारू पिऊन पडून राहत असल्याचं एकाकी प्रमाण वाढलं. मग माझ्या बाहिणी त्यांच्या नागविलेल्या संसाराच्या गोष्टी, कथा घेऊन माझ्याकडे आल्या. तू जाणता आहे, चार लोकांत उठबस आहे, चार अक्षरं समजूतीची लिहतो मग तुझ्या या बेवड्या मेव्हन्यांना कामाला लाव, त्यांना न्याय मिळवून दे म्हणू लागल्या. मग मी पुन्हा औद्योगिक वसाहतीमध्ये माझी पोटाची खळगी भरण्यासाठी टीचभर पानावर लिहलेली पत्र फिरवली.

कामगारांना न्याय मिळाला असावा कदाचित असं वाटू लागलं. मला लोकांनी डोक्यावर घेतलं अन् मग पुन्हा गावात राशन, लोकांना कंत्राटी कामगार म्हणून का होईना माझ्या लेखणीतून रोजगार मिळाला.

 जेव्हा मी असं प्रश्न करत शांता अव्वाच्या अंडाभुर्जीच्या टपरीवर अव्वाला हा प्रश्न केला, तेव्हा अव्वानं उत्तर दिलं भाडखाऊ भाऊ आहेस तू माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. मला काय तुझ्यासारखं दोन-चार अक्षरं वाचता-लिहता येत नाय, पण; तू या वसाहतीमधल्या बायकांना त्यांची झंपराची बटने अन् साड्या फेडण्यापासून वाचवलं रे..!
भूक वंगाळ अस्तीया, लई वंगाळ..! तुला वाटत असल माझ्याकडे दोन-चार गिऱ्हाईक माझ्या चवदार अंडाभुर्जीमुळे येत असतीला पण तसलं काय नाय रे..!

जिंदगी जगतांना माणसं पाहून म्या बी माझा पदर थोडा सैल केला, तुझ्यासारखी अव्वा म्हणणारी माझी माणसं जेव्हा आली तेव्हा तो सावरला. ती बोलत होती मी ऐकत होतो, सध्या जिंदगी झ्याट आहे पण तू असं दोन-चार ओळी लिहून गरिबांना न्याय देत राहशीला तर आंदोलनं उसळणार नाय. तुझी लेखणी आम्हा गोरगरिबांचा आवाज होईल. तेव्हा लेका तू लिहत रहा..!

कुंटणखान्यातील माय-लेक जसं लोकांच्या अन् त्यांच्या जगण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकं दिवसाढवळ्या उरावर घेतात. तसं तू घेत रहावं तुझ्याच मड्यावर आमच्या झ्याट जिंदगीचे प्रॉब्लेम अन् लिहत रहावं चिटुरभर कागदावर निवदनं तुझ्या लेखणीतून. आणि मग साडी न फेडण्याचं सोल्युशन आम्हाला भेटत राहील.

मी काय बोलू अव्वाने दिलेल्या अंडा भूर्जीतला कापलेला, चिरलेला कांदा उभ्याने माणसं चिरावा तसा मला वाटला. मी तो नालीत टाकत अंडाभुर्जी खात होतो, नालीत किडे वळवळ करत होते. अन् डोक्यात पार अंधार पडला होता, गरीबांचा वाली व्हायला हवं अन् त्यांचं प्रतिनिधित्व करणारी आपली लेखणी व्हावी म्हणून लिहायला हवं, लिहायला हवं.
असं वाटून गेलं..!

Written by,
Bharat sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...