मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग- ५

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग- ५

तिकडं शिंगरे ओली होतील अन् सोसाट्याच्या वाऱ्यासह असलेल्या पाऊसामुळे झोपडीला काही होणार नाहीना, याची चिंता त्यांना लागून होती. घरी एकट्या बायकामाणसं असल्यानं वावधन बघून त्यांना अजूनच विचार करून कसेतरी होऊ लागले होते. 

घडी भरच्याने पाऊस ओसरला होता. बराच पाऊस झाल्याने गावातले नदी,नाले वाहू लागले होते. रस्त्याच्या दुतर्फा बाजूने असलेल्या नाल्या तुडुंब भरून वाहत होते. सावत्या माळ्याच्या देऊळामागून गेलेला नाला तुडुंब भरून वाहत होता. अंधारून आलं होतं अन् किर्र अंधारात वाट काढीत संतू, नागू घराच्या दिशेने लागले होते.

पाण्याचा वाहणारा झोका अन् काळोखात खडकाच्या ठोकरा खात जेव्हा संतू अन् नागू आपापल्या झोपडीजवळ पोहचले, तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. दोघे आप आपल्या झोपड्या अन् सभोवतालची झाली अवस्था निरखून बघत होते, नागूने पोहचताच आपल्या शिंगराला बघितले तो झोपडीच्या एका अंगाला पत्र्याच्या तात्पुरत्या निवाऱ्यात बांधून ठेवला होता.

खूप वेळ झालेल्या पावसाने, वावधानाने त्याला हीव वाजून यावं असं झालं होतं. उभ्या उभ्या आपलं थरथरते अंग घेऊन झोपी गेला होता. नागूने त्याला बघून हळूच फाटक लाऊन झोपडी जवळ केली, तो झोपडीत आल्यावर बघतो तर काय रानूबाई अजूनही जागी होती.

सुमनबाई अन् गोंडाजी दिवसभर कामाने थकून गेल्यानं, काही वाहटूळ वाट बघून दोघेही परसदारच्या खोलीत जाऊन पहुडले होते. नागू आलेलं रानुबाईने बघितलं अन् अंगाला पीळ देत ती खाटेवरून उठून माजघरात गेली. तिनं भाकरीचं टोपलं अन् कोड्यासचा डब्बा आणून जेवायला म्हणून बसली, सोबत नागू ओले झालेलं धोतर बदलून ,डोक्याचे पाणी पुसत आला अन् संगतीने जेवायला बसला.
दोघांमध्ये पावसाच्या अन् दिवसभर केलेल्या कामाच्या उद्याच्या कामाच्या गप्पा झाल्या अन् जेवण करून दोघेही झोपी गेले.

पहाट झाली तसे सुमनबाई कोंबड्याच्या बांगेसरशी उठून, तांबड व्हायच्या आत तिने चुल्हीला पांढऱ्या मातीचा पोचारा घेऊन अंगणाला सारवून घेतलं. अंघोळ करून ती झोपडी समोर असलेल्या अंगणात रांगोळी काढत बसली. तिचा दादला गोंडाजी काही वेळानं उठून त्यानं शिंगराला सोडलं अन् तो त्याला उन्हात उन्हं खायला म्हणून घेऊन आला.

गोंडाजी अंघोळ पाणी करून जवळच असलेल्या देऊळमध्ये जाऊन आला. पाटे करायला म्हणून आज दगड आणायला जावं की टाके देत बसावं, हा विचार करत तो आणलेल्या दगडांची गिणती करत बसला. बराच माल तयार करून झाला होता अन् आता उन्हाळासुद्धा सरायला होता म्हणून अजून दोन चार दिवस खाणीतून दगुड घेऊन यावं म्हणून नागूशी बोलता झाला.

नागू नुकतच उठला होता अन् लिंभाऱ्याच्या काडीने दात घासत बसला होता. रानुबाई केव्हाच उठून आपलं न्हाऊन धुऊन सुमनबाईला स्वयंपाक करायला मदत म्हणून भाकरी बडवीत बसली होती .
गोंडाजी नागूला बघत ओसरीवर बसला अन् बोलता झाला.

म्या काय म्हणतो अण्णा अजून दोन-चार दिस दगुड घेऊन येतू म्हणतूया एकदा बरसदीचे दिस सुरू झाली की पुन्हा नाल्याखोल्याला पाणी येईल अन् आपली आबाळ व्हायची.
त्याच बोलणं ऐकून नागू बोलता झाला.

हा रं लेका मी पण ह्योच विचार करत होतो अजून दोन-चार दिस दगड घेऊन आलं का समधे बरं होईल म्हणजे पडत्या पावसात आपली आबाळ होणार नाय.
पुन्हा गोंडाजी बोलू लागला,
हा अण्णा एकदाची बरसद सुरू झाली का मग काय वजीस आपलं दगडाला टाकी द्यायचं काम करत बसू. अन् अधूनमधून पाऊस खंडला की, शहराला एखादं झोपडे लाऊन विकत बसू माल.
नागू बोलू लागला,
हा हे ब्येस असेल, जावा मग आज तुम्ही खदानीला मी अंघोळ पाणी करून बस्तू घाव घालीत दगडाला.

हे ऐकताच गोंडाजी ओसरीवरून उठला अन् त्यानं उन्हं खात असलेल्या शिंगरावर आपली हत्यार ठेवायची पोतडी टाकली. त्यात घन, हातोडा,पाण्याची कॅन अन् काही इतर आवजारे घेऊन तो शिंगराला घमील्यात पाणी देऊन ते पाणी पाजू लागला.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...