मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ११

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ११


चहूकडे अंधारून आलं होतं, काळोख दाटून आला होता. या काळोखाच्या किर्र अंधाराखेरीच तुडुंब भरून वाहणाऱ्या शिवणामायच्या पाण्याचा खळखळाट फक्त या अंधारात ऐकू येत होता. संपूर्ण गाव भूकंपात जमीनदोस्त व्हावं तसं सारं गाव अंधारात निपचित झोपड्यांच्या आड होऊन गारठयाचा जो मिळेल तो आसरा घेऊन पहुडला होता. सांजेचे आठ वाजले तसं सारं गाव चिडीचूप पहुडले होते.

इकडे संतू, नागू अन् गोंडाजी यांची जेवणं आवरली अन् ती तिघे लिंबाच्या पारावर सोजणी अंथरून लिंबाच्या खोडाला मान टेकवून उद्याच्या पहाटे शहराला जायचं नियोजन करु लागली होती.

सांजेला गोंडाजी अन् संतू उद्या पहाटे दोन टेम्पो आपल्याला शहर जवळ करायला लागतील एक आपलं अवजारे, संसार बादली, तयार झालेली वराटे, पाटे, मंदिरात असणारे दिवे, खलबत्ते, मुसळी असं सगळा तयार माल एका गाडीत अन् राहण्यापूर्ता संसार अन् दोघांची तीन खेचर एका गाडीत घेऊन जायचं म्हणून गावातल्या रख्माजीला पहाटेचा सांगावा सांगून, काही इसार देऊन आले होते.

त्याने पहाटे सहालाच झोपड्या मोहरे गाडी आणून लावण्याचं कबूल केलं होतं. आता तिघेही महत्त्वाचं काम झाल्यानं निवांत होते.

सांज सरली तसं अंधारून आलेल्या ढगाडात पावसाची ढग दाटून आली होती. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसतो की काय असं वाटून गेलं होतं. वाऱ्यावावधनाचा पाऊस आला तर पालं उडायची भिती होती. पण; बिरोबाच्या कृपेनं अन् नागूने मंत्र मारून पावसाला वळून दिल्यानं पाऊस वाऱ्याच्या वेगासरशी गावाच्या उत्तरेला कलला होता.

गावाच्या उत्तरेकडील दिशेनं पाऊस कलला तसा, गावाच्या निसर्गावर काळी ठिगळं दिलेली घोंगडी अंथरावी तसं आसमंत त्याचं काळोखात दाटून आलेलं सौंदर्य दाखवत होता. वावधन सुटलं होतं अन् दिवसभर दगुड फोडून थकलेला गोंडाजी व संतू हा गारवा अनुभवत नागूशी बोलत बसले होते.

बराच वखत गप्पा झाल्या अन् उतरवयाचं लक्षण दिसू लागलेला नागू दोघांना येतूया म्हणून आपली सोजनी झोपडीच्या बाहेर अंथरलेल्या खाटेवर टाकून अंगावर एक कंबळ अंगावर घेत खाकरत, खोकरत झोपी गेला.

इकडे संतू अन् गोंडाजी कोपरीच्या खिश्यातून चंची काढून तंबाखूला चूना लाऊन गप्पा करीत तिला मळीत होते. बराच उशीर झाला होता, दोघांनी आपल्या हातातली मळीलेली तंबाखू फटका देऊन ओठाखाली दाबली अन् उद्या पहाटे लवकर उठायला हवं म्हणून झोपडी जवळ केली.

संतू त्याच्या झोपडीजवळ आला तेव्हा संतूची बाई मोहरल्या अंगणात भांडे घाशीत बसली होती. संतू तिला दुरूनच न्याहाळत तिच्याजवळ येऊन उकीडवा बसला. तिच्याशी गप्पा मारीत बसला, उद्याचं तिचं काम अन् पहाटे काय करायला हवं असं एकूण दोघांचं नियोजन त्यांनी केलं.

भांडी घासून झाली तसे भांड्याची दुरडी संतुने उचलली अन् तो त्याच्या बायकोकडे बघू लागला. संतूचं हे असं दूरडी उचलणं त्याच्या बायकोला पहीलून होतं, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक अनामिक प्रेमाचं हसू आलं अन् तिनं संतूकडे बघत बालिश भाव करून, गोंडाजी गुण लागलासा काय..! असं तिचा दादला संतूला बोलून गेली. दोघं पुन्हा मोठ्यानं हसत झोपडीच्या आत गेली, ताटीला अडकुत घातल्या गेलं अन् सुखी संसाराच्या त्यांच्या गुजगोष्टी सुरू झाल्या.
संतूचं हे बदलेलं वागणं बघुन त्याची बाय आज त्याच्यावर ज्याम खुश होती.

इकडे गोंडाजी झोपडी पहूर येवोस्तोवर रानूबाई अन् सुमनबाई उद्याच्या पहाटे निघायचं म्हणून भांडीकुंडी करून, लागणारी संसारबादलीची बांधाबुंध करत होत्या. गोंडाजी आला तसं त्यानं झोपडीच्या चारी मोहरं लावलेला दगुड चापलून बघितला अन् तयार जिनशीचा माल बघून उद्याच्याला गाडीभरून माल होईल का याचा अंदाज तो लावत बसला.

खेचराजवळ जाऊन त्यांच्या पाठीवर हात फिरवत त्यांना एका अंगाला पाणी दाखवून त्यांना त्याने बांधून टाकलं. अन् काहीबाही दोनचार पेंड्या गवताच्या, उरलेल्या भाकरी त्यांच्यापुढे टाकून तोही झोपडीत शिरला.
येदूळपर्यंत रानुबाई अन् सुमनबाई यांची आवरासावर झाली अन् त्यांनी दिवसभर आपलं कामाने, वणवण भटकंती करून थकलेलं शरीर त्यांनी धरणीला टाकलं व दोघीही झोपी गेल्या.

गोंडाजी बाजूलाच खाट टाकून तिच्यावर पडून राहिला, उद्याच्या कामाचा तो विचार करत बसला होता. हळूहळू बाहेर होणारं वावधन बरच शांत झालं होतं. पिठाच्या डब्ब्यावर लावलेला लाम्हण दिवा हळू हळू मालवत चालला होता.

क्रमशः

Written by,
Bharat Sonawane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड