मुख्य सामग्रीवर वगळा

तरवट

"तरवट" 

गेले पंधरा दिवस Running मुळे जरा एकाकीच उजव्या पायाचे Sciatica (Buttocks) इजा झाल्यासारखे दुखायला लागले होते. Running झाल्यानंतर Warm-up, Stretching हे सगळं नियमित करूनही हा त्रास सुरू झाला होता. टॅब्लेटस् अन् डायट घेऊनही समाधानकारक असा फरक पडत नाहीये.

मग काल मित्राच्या सांगण्यावरून निसर्ग जवळ केला अन् भर दुपारी दोनच्या सुमारास या "तरवट" च्या शोधात भटकत राहिलो. काळाच्या ओघात निसर्ग आपल्यापासून कसा दुरावत आहे हे नेहमीच जाणवत होतं. पण; हे काल अजूनच प्रकर्षाने जाणवलं.

ही झाडं शक्यतो डोंगर उताराच्या, मुरमाड रानात अन् मानवी वस्ती असलेल्या परुंतू बऱ्यापैकी मोकळ्या जागेत खडकाळ रानात उगते. आमच्या तालुक्याच्या घराला चांगलं निसर्गसौंदर्य लाभलं आहे, त्यामुळं पंधरा-वीस वर्षापूर्वी ही झाडे अगदी घराच्या सभोवताली असलेल्या मोकळ्या रानात मोप प्रमाणात होती. 

पण; गेल्या काही वर्षात निसर्गाचा झालेला ऱ्हास, जमिनीची झालेली धूप यामुळे ही झाडी आता घराच्या जवळ उपलब्ध नाही. मग काय दुपारच्या रणरणत्या उन्हात भटकत होतो. अडीच- तीन की.मी रानात भटकंती करत ही झाडी मिळवली. घराच्या सभोवताली अजूनही मोठ्या प्रमाणात डोंगर, टेकड्या असल्यानं मस्त भटकंती होत असते. ती भटकंती सवयीची आहे, यामुळे अजूनही शहराला गेलो की मला शहरात फारसे करमत नाही अन् मग या मोकळ्या खडकाळ रानात असा एकाकी भटकत राहतो. लाल मातीचा पायांना स्पर्श करून घेत राहतो, रानातल्या फुफाट्याच्या वाटा जवळ करून घेत राहतो. 

भर उन्हात भटकत असताना एकाकी असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या पल्याड असलेल्या मोकळ्या रानात ही झाडी भेटली. माझा अंदाज बरोबर निघाला. मग काय हव्या तेव्हढ्या डहाळ्या तोडून घेतल्या.

उन्हामुळे जरा जास्तच गरमत होतं म्हणून वरती टेकडीच्या आश्रयाला गार हवेत बसूया असा विचार मनात आला आणि दुखरा पाय फरफटत घेऊन टेकडीवर गेलो. तहान लागली होती मग एका झिऱ्यातून निघत असलेलं पाणी डायरेक्ट त्यात तोंड घालून पोटभर पिऊन घेतलं. तेव्हा पोटात जो गारवा जाणवला त्याचं सुख काही औरच, मग टेकडीवर हवेशीर बसून राहिलो.

खदानीत काही बायका धुणे धूवत होत्या, काही गुराखी बकऱ्या, गुरे चारत होती त्यांना न्याहाळत बसलो. जीवाला जरा थंड वाटलं तेव्हा एका बाभळीच्या पडसावलीत घंटाभर तिथच निजून राहिलो.

सूर्य अस्ताला कलला तसं पुन्हा घराची वाट जवळ केली. घरी आलो ठरलेली कामे झाली अन् जेवणं झाल्यावर तरवटचा पाला तव्यावर गरम करून सुती कपड्यात पायाला बांधून झोपी गेलो. सकाळी बऱ्यापैकी आराम जाणवला, आता आठ दिवस रोज पाल्याचा उकडा लावल्यासारखं जायचं पाला घेऊन यायचं.

बरं आहे आयुष्य निवांत आहे, नशिबाने निसर्ग जवळ आहे. मग भटकत असतो असं अधूनमधून, कधीकधी वाटतं आपलं जगणं थोरोमय आहे. ज्या जगण्यात सुखून आहे, फार अपेक्षा नाही जगण्याकडे असं हे निवांत जगणं.

आता पुन्हा जाईल थोड्यावेळाने पाला आणायची वेळ झाली की, भटकत राहील जोवर घराची वाट जवळ करावी वाटत नाही तोवर.

Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...