मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ३

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ३

संसारासाठी झुरत असणारी रानूबाई नागुला दिसू लागली होती तसे त्याला त्याचे अन् रानूबाईचे नव्याचे नवतीचे नऊ दिवस आठवू लागले होते. नागू आणि रानूबाई यांचं लग्न झालं अन् घरात आपसात होत असलेल्या कलहामुळे दोघे सासूसासऱ्यांनी वायली काढली.

एकदमच वायली निघाल्यामुळे काय करावं ? हा प्रश्न होता. वडिलोपार्जित काम जमत होतं पण इतका अनुभव नागूच्या पाठीशी नव्हता पण आता हे सगळं काम आपल्याला करणं भाग होतं, तेव्हा त्याला रानूबाईची खंबीर साथ लाभली. संसाराला लागणारं साहित्य घेऊन ते दोघे भटकत भटकत भिल्हाटी गावच्या खदानीला आले.

तिथं संतूशी ओळख झाली अन् काम भेटलं, सुरूवातीला रानूबाईसुद्धा नागूला माणसांच्या बरोबरीने खदानीमध्ये दगड फोडायला मदत करू लागली. पर्याय नव्हता, हाताला काम नव्हतं आलेलं काम करणं भाग होतं.

नवतीचे नऊ दिवस संसार फुलू लागला होता, संसाराची घडी बसत होती.भर उन्हात काम करायचं, काळा पाषाण फोडायचा. उन्हं मिन मिन करायची उन्हाच्या झळा दूरवर तुटत असतांना नागू अन् रानूबाई आपल्या डोळ्यांशी हातची वर्तुळे करून बघायची. या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुख मिळवत एकमेकांना एकमेकांचा आधार होत ती दोघे काम करायची.

भर दुपारी भरली की घटकाभरचा विसावा म्हणून खदानीच्या आडकपारीला डोंगरातून पाझरणाऱ्या पाझराजवळ गारवा अनुभवत घाम टिपून निवांत अंग टाकून दोघे पडून रहायची. मग काही काळ विसावा घेतला की धुडक्यात असलेली भाकर अन् जाड पिठलं, ठेचा खाऊन पुन्हा शिंगराच्या पोटाची उशी करून ती दोघं निपचित पडून रहायची.

नवे नवतीचे दिवस असल्यानं मग अश्या या गार वेळेत ती दोघं डोळ्यांनीच प्रेमाचे खेळ खेळायचे अन् बराच वेळ निवांत पडून रहायचे. तीनचा पार कलला की अजून घडीभर सांजेच्या उतरत्या उन्हात नागू दगड फोडायचा अन् रानूबाई तो शिंगराला बांधून काही दगडांना टाके मारत बसायची.अश्यावेळी कधी संतू अन् त्याची जोडीदारीन सोबत असायची तर कधी हे एकटेच असायचे दोघं.

दोघांचा हा फुलणारा संसार बघून नागूचा लहान भाऊ गोंडूजी त्यांच्याकडे रहायला आला. तो ही खूप मेहनत करू लागला,तिघे रात्रंदिवस काबाडकष्ट करू लागले. पुढे गोंडाजीचं जवळच्या एका गावातील भावकीत असलेल्या पाहुण्याच्या पोरीशी लग्न लाऊन दिलं अन् सुमनबाई लहानगी भाउजय म्हणून त्यांच्या घरात नांदायला आली. ती पण तितकीच कष्टाळू निघाली आत चौघे कष्ट करत होते सुखाचा संसार अजून फुलत होता.

दिवसभर फोडलेला दगड शिंगरावर टाकून घरी आणायचा त्याला शिंगरावरून उतरून व्यवस्थित लावायचं मग त्यांच्या आकारानुसार वऱ्हाटे, पाटे, मंदिरात असलेले दिवे,जाते असं काही बाही करून ती विकायला म्हणून जवळच असलेल्या तालुक्याच्या गावाला घेऊन जायचं मग विकलेल्या पैक्यात घराला लागणारा दाळदाना करायचा असं एकूण त्यांचं घर चालत होतं. 

दूरवर अस्ताला जाणाऱ्या सूर्याला बघत शून्यात अन् या आठवणीत रममाण झालेला नागू रानुबाई जवळ आल्या तेव्हा तिच्या कोल्हापुरी वाहनांचा आवाज आला तसा भानावर आला. उंचपुरी, लांब नाकाचा शेंडा असलेली अन् घारुळे डोळे असणारी, गोरीपान अन् सडपातळ शरीराची रानुबाई ढवळ्या पिवळसर लुगड्यात अजूनच सुंदर दिसायची.

आज तिचं हे रूप बघून नागू तिच्या रूपाला भुलला होता. दिवसभर इतकं वणवण करूनही लक्ष्मी आईच्या चेहऱ्यावर तेज असावं तितकं तिच्या चेहऱ्यावर होतं. तिनं नागूकडे बघत डोळ्यांनीच त्याला खुणावले अन् तो लाजून तिच्या डोक्यावर असलेलं खलबत्त घेऊन त्याला ठरलेल्या जागी ठेवायला निघून गेला. आज तो पुन्हा रानू बाईच्या प्रेमात पडला होता, त्याला पुन्हा त्यांचे जूने दिवस आठवत होते. आता सांज सरायला होती. 

नागूने दिवसभर टाके मारून ठेवलेली वऱ्हाटे, पाटे एकांगाला लावली अन् तो खाटेवर बसून राहिला. रानुबाई आली तसे अंगणाची झाडझुड करून सडापाणी करून मोहरल्या अंगणात तिच्या झोपडीला शोभेल अशी टिपक्याची रांगोळी काढून. हातपाय धुऊन केसांचा आंबडा घालून नागूपाशी खाटेवर येऊन बसली अन् दिवसभर केलेल्या भटकंतीतून आराम म्हणून नागूशी काहीवेळ अस्ताला जाणाऱ्या सूर्याला बघत गप्पा करत राहिली..!

क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड