मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ३

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ३

संसारासाठी झुरत असणारी रानूबाई नागुला दिसू लागली होती तसे त्याला त्याचे अन् रानूबाईचे नव्याचे नवतीचे नऊ दिवस आठवू लागले होते. नागू आणि रानूबाई यांचं लग्न झालं अन् घरात आपसात होत असलेल्या कलहामुळे दोघे सासूसासऱ्यांनी वायली काढली.

एकदमच वायली निघाल्यामुळे काय करावं ? हा प्रश्न होता. वडिलोपार्जित काम जमत होतं पण इतका अनुभव नागूच्या पाठीशी नव्हता पण आता हे सगळं काम आपल्याला करणं भाग होतं, तेव्हा त्याला रानूबाईची खंबीर साथ लाभली. संसाराला लागणारं साहित्य घेऊन ते दोघे भटकत भटकत भिल्हाटी गावच्या खदानीला आले.

तिथं संतूशी ओळख झाली अन् काम भेटलं, सुरूवातीला रानूबाईसुद्धा नागूला माणसांच्या बरोबरीने खदानीमध्ये दगड फोडायला मदत करू लागली. पर्याय नव्हता, हाताला काम नव्हतं आलेलं काम करणं भाग होतं.

नवतीचे नऊ दिवस संसार फुलू लागला होता, संसाराची घडी बसत होती.भर उन्हात काम करायचं, काळा पाषाण फोडायचा. उन्हं मिन मिन करायची उन्हाच्या झळा दूरवर तुटत असतांना नागू अन् रानूबाई आपल्या डोळ्यांशी हातची वर्तुळे करून बघायची. या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुख मिळवत एकमेकांना एकमेकांचा आधार होत ती दोघे काम करायची.

भर दुपारी भरली की घटकाभरचा विसावा म्हणून खदानीच्या आडकपारीला डोंगरातून पाझरणाऱ्या पाझराजवळ गारवा अनुभवत घाम टिपून निवांत अंग टाकून दोघे पडून रहायची. मग काही काळ विसावा घेतला की धुडक्यात असलेली भाकर अन् जाड पिठलं, ठेचा खाऊन पुन्हा शिंगराच्या पोटाची उशी करून ती दोघं निपचित पडून रहायची.

नवे नवतीचे दिवस असल्यानं मग अश्या या गार वेळेत ती दोघं डोळ्यांनीच प्रेमाचे खेळ खेळायचे अन् बराच वेळ निवांत पडून रहायचे. तीनचा पार कलला की अजून घडीभर सांजेच्या उतरत्या उन्हात नागू दगड फोडायचा अन् रानूबाई तो शिंगराला बांधून काही दगडांना टाके मारत बसायची.अश्यावेळी कधी संतू अन् त्याची जोडीदारीन सोबत असायची तर कधी हे एकटेच असायचे दोघं.

दोघांचा हा फुलणारा संसार बघून नागूचा लहान भाऊ गोंडूजी त्यांच्याकडे रहायला आला. तो ही खूप मेहनत करू लागला,तिघे रात्रंदिवस काबाडकष्ट करू लागले. पुढे गोंडाजीचं जवळच्या एका गावातील भावकीत असलेल्या पाहुण्याच्या पोरीशी लग्न लाऊन दिलं अन् सुमनबाई लहानगी भाउजय म्हणून त्यांच्या घरात नांदायला आली. ती पण तितकीच कष्टाळू निघाली आत चौघे कष्ट करत होते सुखाचा संसार अजून फुलत होता.

दिवसभर फोडलेला दगड शिंगरावर टाकून घरी आणायचा त्याला शिंगरावरून उतरून व्यवस्थित लावायचं मग त्यांच्या आकारानुसार वऱ्हाटे, पाटे, मंदिरात असलेले दिवे,जाते असं काही बाही करून ती विकायला म्हणून जवळच असलेल्या तालुक्याच्या गावाला घेऊन जायचं मग विकलेल्या पैक्यात घराला लागणारा दाळदाना करायचा असं एकूण त्यांचं घर चालत होतं. 

दूरवर अस्ताला जाणाऱ्या सूर्याला बघत शून्यात अन् या आठवणीत रममाण झालेला नागू रानुबाई जवळ आल्या तेव्हा तिच्या कोल्हापुरी वाहनांचा आवाज आला तसा भानावर आला. उंचपुरी, लांब नाकाचा शेंडा असलेली अन् घारुळे डोळे असणारी, गोरीपान अन् सडपातळ शरीराची रानुबाई ढवळ्या पिवळसर लुगड्यात अजूनच सुंदर दिसायची.

आज तिचं हे रूप बघून नागू तिच्या रूपाला भुलला होता. दिवसभर इतकं वणवण करूनही लक्ष्मी आईच्या चेहऱ्यावर तेज असावं तितकं तिच्या चेहऱ्यावर होतं. तिनं नागूकडे बघत डोळ्यांनीच त्याला खुणावले अन् तो लाजून तिच्या डोक्यावर असलेलं खलबत्त घेऊन त्याला ठरलेल्या जागी ठेवायला निघून गेला. आज तो पुन्हा रानू बाईच्या प्रेमात पडला होता, त्याला पुन्हा त्यांचे जूने दिवस आठवत होते. आता सांज सरायला होती. 

नागूने दिवसभर टाके मारून ठेवलेली वऱ्हाटे, पाटे एकांगाला लावली अन् तो खाटेवर बसून राहिला. रानुबाई आली तसे अंगणाची झाडझुड करून सडापाणी करून मोहरल्या अंगणात तिच्या झोपडीला शोभेल अशी टिपक्याची रांगोळी काढून. हातपाय धुऊन केसांचा आंबडा घालून नागूपाशी खाटेवर येऊन बसली अन् दिवसभर केलेल्या भटकंतीतून आराम म्हणून नागूशी काहीवेळ अस्ताला जाणाऱ्या सूर्याला बघत गप्पा करत राहिली..!

क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...