मुख्य सामग्रीवर वगळा

संगमेश्वराचं देऊळ..!

संगमेश्वराचं देऊळ..! 
संगेश्वराचं देऊळ..!

गावाला आलं की मी कुठे जावो न जावो या देऊळात न चुकता जातो म्हणजे जातो.ज्याप्रमाणे प्रत्येक गावाच्या एकांताला,एकांगाला महादेवाचं देऊळ असते अगदी त्याच पद्धतीनं हे ही देऊळ माझ्या गावाच्या अगदी एकांगाला,एकांतात आहे..!

तसं माझं,आमचं गाव सोडून आम्हाला बरीच वर्ष झाली,एखाद-दोन वर्षांचा असेल मी तेव्हा बाबांनी गाव सोडले अन् आमच्या शिक्षणाला म्हणून आम्ही तालुक्याच्या गावाला रहायला आलो,ते तालुक्यातच स्थिर झालो..!
परंतु गावाशी जोडलेली नाळ काही केल्या तुटली नाही,सनवार,लग्न,इतर कार्यक्रम,शेतीचे कामे असले की गावाला येणं होतं.गावाला शेती अन् धूळखात पडलेल जुन्या पद्धतीचं आमचं घर अजूनही आहे,जे शेवटच्या घटका मोजत आहे.जिथं माझं बालपण,वडिलांचं उभे आयुष्य याच्या जिवंतखुणा अजूनही दिसतात,त्यामुळे त्याचं नुतनीकरण करण्यास मन कधी धजावले नाही..!
घराच्या समोर असलेला वाहत्या शिवनामायचा परिसर,संत सावता माळ्याचे भव्यदिव्य मंदिर,हनुमानाचे कळसावर गरुड विराजमान असलेलं मंदिर,पुढे एकांगाला असलेलं संगेश्वराचं देऊळ अन् आयुष्याला शेवटचं वळण भेटलं की वेशीतून शेवटचा निरोप द्यायचा असतो ती गावची जुनी वेस,वेशी पल्याड स्मशानभूमी असं काही चित्र या जुन्या घरासमोरचे,घराला लागून असलेल्या जागेला राम लक्ष्मण सीतामाईच्या मंदिराला दान म्हणून आजोबांनी दिलेली जागा अन् या जागेत उभे असलेले सुंदर असे मंदिर..!
पहाटेची साखर झोपेतून येणारी जाग ही मंदिरात चालू असलेल्या काकडा आरतीने,घरासमोर असलेल्या पिंपळाच्या झाडावर असलेल्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने होते.रात्रीची झोपेची वेळ ही गावातल्या वारकरी असलेल्या माझ्या माऊलीच्या सुंदर अभंगानी होते.पहाटेच्या अन् सांजेच्या वेळी कितीवेळ शिवनामायच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहाला बघत नजरेत सामावून घेतलं जातं,त्यामुळेच की काय गावाशी जुळलेली नाळ मला इतक्या वर्षांनीसुद्धा गावाला घेऊन येते..!
शिवनामायच्या एकांगाला गुलमोहराच्या रानात शिवनामायच्या पात्रात असलेल्या बेसरमाच्या सानिध्यात संगेश्वराचं देऊळ वसलेलं आहे.काळाच्या ओघात वेळोवेळी याची डागडुजी करण्यात आली अन् इतिहासच्या खुणा मिटत गेल्या.या काळात तिथं वास्तव्य करत असलेल्या भामासाद महाराजांचे आपल्याला सोडून जाणं अन् त्यांचं वास्तव्य जोवर या देऊळात होतं तोवर छान वाटायचं पण अलिकडे फारसे मन त्या ठिकाणी रमत नाही एक कमी वेळोवळी जाणवते..!
कधीतरी गावाला आलं की या मंदिराच्या सभामंडपात घटकाभर बसून राहणं होतं,एकांताचा सानिध्यात चिंतन होतं,तेथे असलेल्या जुन्या लाकडी स्ल्याप असलेल्या आश्रमाची ऊब अनुभवता येते, काहीवेळ आयुष्याला घेऊन करत असलेल्या सर्वच अपेक्षा किती गौण आहे याचं भान या ठिकाणी होतं..!
अन् मग कितीवेळ शिवनामायच्या पात्राला असलेल्या दगडी पायऱ्यावर बसून संथ वाहणाऱ्या पाण्याला बघत राहणं होतं,नशिबात असेल तर कधीतरी नावड्याचा मासे पकडण्याचा,पात्रात जाळे टाकण्याचा खेळ अनुभवता येतो.कुणाच्या लेकीच्या,नातीच्या,नातवाच्या आसरा,कुणाचे जावळे फेडण्याच्या कार्यक्रमाला बघता येतं..!
सोबतच मग विचार येऊन जातो की शिवनामायच्या अंगाखांद्यावर खेळतच आपलं आयुष्य संपणार आहे,बाकी गोष्टी निमित्त लावलेलं आहे,आयुष्य जगण्याला कारण म्हणून आपण त्या गोष्टी करत असतो,जन्माला आल्यावर होणारे सोहळे,विधी तिच्या साहाय्याने अन् मृत्यू झाला की होणारे विधी,श्राद्धसुद्धा तिच्याच सानिध्यात होत असतात...!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...