मुख्य सामग्रीवर वगळा

तुळशी माळ गळ्यात घातलेले एकनाथ बाबा..!

तुळशी माळ गळ्यात घातलेले एकनाथ बाबा..!


सुर्य मावळतीला होता,गाव,रानावर सर्वदूर तांबड पसरलं होतं अन् एकनाथ बाबांना रानातून घराकडे जायची ओढ लागली,तसं ते सांजेची कामे बिगीबिगी आवरते करू लागले.गोठ्यातील गुरे हौदावर पाणी पाजून,त्यांना वैरण टाकून,गायीचे दूध क्यानीत काढून त्यांनी सपराला असलेल्या पत्राला कडीकोंडा घालून कुलूप घातलं..!
उटळं कंबराच्या कर्धोड्यात अडकुन ते सपराला लागून असलेल्या न्हाणीघरात घुसले,हातपाय धुवून वावरातले कापडं बदलून एकनाथ बाबा घराच्या वाटेनं निघाले होते..!

अंगात असलेला सदरा घालून घालून पार विरून गेला होता,चार ठीकाणी ठीगळं दिलेलं धोतर घालून,वाटेनं चालत आपल्या आयुष्याचे उरे दिवस ते पुरे करत होते.वाहनाला चिंदकाने बांधुन एकएक दिवस काढीत होते,त्यांना नको होतं अंगाला सुटर की वाजली नाही कधी थंडी त्यांना या कडाक्याच्या हिवाळ्यातही..!

अलीकडच्या सालाभरात त्यांना दिसायला कमी झालं होतं,म्हणुन त्यांच्या लेकानं शहरातल्या सरकारी दावखाण्यातून त्यांना एक जाड भिंगाचा चष्मा आणला होता.एकनाथ बाबा त्या जाड भिंगाच्या चष्म्याला जीवापाड जपत असायचे,आयुष्यभर गळ्यात तुळशीमाळ अन् आता या उतारवयात त्यांच्या गळ्यात तुळशीमाळेसोबत या चष्म्याची चष्मा पडून फुटू नये म्हणून त्यांनी चष्म्याला सुतळीची गाठ देऊन ती गळ्यात घातलेली सुतळी होती..!

ते वाटेनं निघाले होते,थकले असल्याकारणाने हळुवार पावलं टाकत,धापा देत ते घराची वाट जवळ करत होते.हातात असलेली दुधाची क्यान त्यांच्या चालण्याबरोबर दोलकाप्रमाणे हलत होती तिच्या सोबतीने ते ही थरथरत चालत होते..!

एकनाथ बाबांना मी वाटेनं दूरवर जास्तोवर बघत होतो,मी पण रानातून घरी निघणारच पण हिवाळ्याची आता कुठं बोर पिकायला लागली होती.ईळभर कुठं वख्त असतो बोराटीच्या झाडाकडे बघायला,मग गेलो बोरं खायला,बोराटीच्या झाडाखाली..!
अजून म्हणावी तशी बोर पिकली नव्हती,आलोच आहे तर ठरवून बोरं खायचीच म्हणून मग खाल्लीच कच्चीपच्ची,हातात बोराटीचा काटाही घालून घेतला..!

मावळतीचा सुर्य अस्ताला गेला होता,मावळला होता.अंधारून आलं होतं अन् सोसाट्याच्या वाऱ्यासह,हवेत गारठा भरला होता.दिवसभर डोईवर डालग्यांनी मक्काची कंस वाहून अंग पार भरून अालं होतं,डालगे वाहून वाहून पाय पार जड पडले होते,दुखत होते,बोरं खाऊन मी ही कसेतरी घराच्या वाटेला लागलो..!

एकनाथ बाबा चालत होते हळुहळू,सोबतच न्याहाळत होते वस्त्यावरील लोकांची ती बडबड,रहदारी,दुरूनच येणारा तो वस्तीवरल्या झोपड्यांमधला बोंबलाच्या खुडीचा वास.पांदीनं बकय्राच्या खुरांमुळे तांबड्या आसमंतात उदळलेली तांबरट माती अन त्या मातीचा येणारा ईसाडा,मुतरट वास पांदीनं घेत आम्ही दोघे चालत होतो,गाव जवळ करत होतो..!

काही वख्तानं मी घरला पोहचलो,एकनाथ बाबा पावलं मोजीत मोजीत येत होते,वाटेनं असलेल्या सावता माळ्याच्या,हनुमानाच्या देवळा महूरं वाहना काढून उभे राहत होते अन् देवळाच्या बाहेरूनच मनोभावे देवाचे पाय पडत,बोळकं झालेल्या तोंडातून काहीतरी पुटपुटत घराची वाट जवळ करत होते..!

मी घरला आलो बघून मायना चुलीवर पाणी तापायला ठेवलं होतंच,ते घेऊन मी मोरीत गेलो हातपाय धुतले.तुटक्या आरश्यात बघत बघत वाढलेले केस फनीने मागे घेऊन,मधोमध भांग पाडला अन मी मलाच हसू लागलो..!

मायनं आवाज दिला,
ओ छोटे सरकार चलतूया का,कितीक नटूतुया..!
चहा उकळली हायसा..!
मी पडवीत आलो अन् चुल्हांगणजवळ बसलो.चुल्हांगनात लाल भडक विस्तव असल्यानं अंगातला गारठा निघून गेला होता,त्या चुल्हीच्या आहारा मोहरं माझा चेहरा प्रसन्न होऊन,खुलला होता..!

मग मायने गिल्लासभर चहा दिला,माझ्यासाठी पिठाच्या डब्ब्यात लपऊन ठेवलेले बटर मला दिले.मी चहा-बटर खाऊन पिठाच्या डब्यावर ठेवलेल्या चिमणी पुढं बसून पाटीवर उजळणी खरडत बसलो होतो..?
मी अजुनही उजळणीच शिकत हुतो.माझावाला 'बा' आम्हाला सोडून गेला अन् मग मला शाळा नावालाच राहिली होती.मला भी काम करायला लागलं,पोटासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी.भूक कुठं शाळा शिकू देतीया,पण आता बसतो सांच्याला काहीवेळ पाटी,पुस्तुक घेऊन..!

घटका भरच्यानं मायना भाकर खायला बोलीवलं अन् म्या अन् मायना भाकर खावून घेतली,भाकर खाऊन मी अंगावर गोधडी,घोंगडी घेऊन परसदारी असलेल्या खाटीवर पडलो होतो.अंगणात न्याहाळत ये-जा करणाऱ्या वाटसरूंना..!

पाय खूप दुखायला लागले होते,इतक्यात मगाशी वाटेनं भेटलेले एकनाथ बाबा मला वाटेनं दिसले.मी न राहून त्यांना आवाज दिला एकनाथ बाबा कुठशिक निघाले हायसा..? 
त्यांनी हातानं खुणावतच मला देऊळात जातोया असं सांगितलं.काही केल्या मला झोप काही येत नव्हती,कितीवेळ आकाशात तार्यांना पाहत बसलो..!

अंगात हुडहुडी भरून आली सुटर घातलं,गल्लीत पोरांनी शेकोटी पेटीली हुती तिथं जाऊन बसलो.घटकाभरानं एकनाथ बाबा पुन्हा देवळातून आले,त्यांच्या घरच्या रस्त्याला ते चालत गेले.मी पाहिलं ते कव्हारभर त्यांच्या घराच्या व्हरांड्यात त्या चष्म्याला बघत बसले होते,अन् मनातच मनाशीच काहीतरी बडबड करत आपल्या धुंदीत हातवारे करत होते..!

मी खाटेवर जाऊन झोपलो,अंगावर घोंगडी घेऊन डोळे बंद केले.पण एकनाथ बाबा अजून चष्म्याकडेच पाहत होते,कधी आकाशाकडं पाहत होते त्यांना थंडी वाजत नव्हती,नव्हते दुखत त्यांचे पाय दिवसभर काम करून.परंतु म्हाताऱ्या बाबांचं काहीतरी बिनसलं होतं कुणाशी ते कळायला मार्ग नव्हता..!

मी मात्र दमलो असल्यानं,डोळे लागायला लागले होते,आता मलाही झोप आवरत नव्हती मी डोळे बंद करून एकनाथ बाबाबद्दल विचार करत झोपी गेलो.गाढ झोप लागल्यानं मला पहाटे कोणाच्या रडण्याचा आवाज कानी पडल्यानं माझी झोप उडाली,खाटेवर उठून बघतो तर काय..!

एकनाथ बाबा आम्हाला सोडून देव लोकाला निघून गेले होते, त्यांचे लेवूक,सूना,नातवंडे मोठ्यानं आक्रोश करत होते.माय तिकडं जातेय म्हणुन मला आवरायला सांगून निघून गेली.मी बाजीवरून पारोश्या डोळ्यांनी एकनाथ बाबाला बघत राहिलो..!
एकनाथ बाबांच्या गळ्यात असलेली तुळशी माळ अन् चष्म्याची सुतळी तशीच होती,चष्मा डोळ्यावरून निघून खाली लोंबत होता, एकनाथ बाबांच्या वहाणा एकांगाला धूळखात पडून होत्या..!

काय झालं असावं एकनाथ बाबाला..?
या प्रश्नाला उत्तर नव्हतं,पण बाबाला त्याचं मरण कळलं असावं.
म्हणून काल सांजेपासून एकनाथ बाबा मंदिराचा धावा घेत होते,आपल्या चष्म्याला निरखून निरखून बघत होते..!
प्रश्न खूप होती पण त्यांना उत्तरे नव्हती ती ही एकनाथ बाबांच्या पायावाणी अनवाणी झाली होती अन् मी निःशब्द होवून एकनाथ बाबांचा देह डोळ्यांत भरून घेत होतो..!

Written by
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड