मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्याची वाटचाल..!

आयुष्याची वाटचाल..!

आयुष्याला घेऊन जेव्हा विचार करतो तेव्हा मला खूप स्पष्ट अशी एकच गोष्ट वाटते की,जिथं कुठल्याही शक्यता,उद्याचा विचार केला जात नसेल म्हणजे हे फक्त माझ्या नजरेतून.आयुष्यात आयुष्याच्या उत्तरार्धात किंवा आयुष्यभर तुला काय करायला आवडेल..? असा प्रश्न मला कुणी विचारला की मी खूप सहज सांगून जातो की मला फक्त चालत रहायला आवडेल..!

होय मला फक्त चालायला आवडेल,मग त्या चालण्यासाठी नसेल कुठला उद्देश किंवा काहीतरी साध्य करायचं आहे म्हणून माझं चालणं.कारण फक्त मिळेल त्या रस्त्यानं भटकण्यात अन् रोज आपल्याच विश्वात आपल्याला नव्याने बघायला भेटणाऱ्या ठिकाणांना,निसर्गाला अनुभवण्यात जे सुख आहे ते आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात नाही..!

आजही ठरवून माझं ओळखीच्या प्रदेशात पाच सात किमी रोजचं चालणं होतं पण रोजचा हा ओळखीचा प्रदेशसुद्धा मला नियमित रोज नव्याने भेटत असतो.निसर्गाला आपण जवळ केलं अन् निसर्गाच्या सान्निध्यात राहून रोजच रोजच्याप्रमाणे त्यात होणारे छोटे छोटे बदल बघितले की आयुष्याला घेऊन आपण काही अपेक्षांसाठी खूप काही मिस करतोय असं वाटायला लागतं..!

खूपवेळा निसर्गाच्या सान्निध्यात राहून डोळ्यांना सामोरी दिसणाऱ्या वाटाशी बोलायचं,पायाशी लोळण घेणाऱ्या मातीशी बोलायचं,कधीतरी जमिनीशी बोलत बोलत तिच्यावर उगलेल्या अन् आपल्या आयुष्याचा शेवट मोजणाऱ्या,सुकलेल्या तृणास बोलायचं,छोटे छोटे फुलं त्यांचं काही महिन्यांचं आयुष्य जे निर्व्याज,कुठलीही अपेक्षा न करता जगणं हे खूप सुंदर आहे..!
जे आपण डोळ्यांनी अन् मनाला त्यांच्याकडे बघण्याची,परखण्याची नजर लाभली की बघत बसायचं,संवाद करत राहायचं त्यांच्याशी..!

वाटेला लागून असलेली आपला शेवटचा काळ मोजत असलेली बोडकी बाभूळ दिसली की तिच्या कृश झालेल्या फांद्यावर एकदा प्रेमानं हात फिरविण्यात जे सुख लाभते,मऊ हाताला तिचा जो अनुभवी,रापलेला स्पर्श होतो त्यावेळी कित्येक दशकांचा इतिहास ती तिच्या माध्यमातून आपल्याला सांगू बघत असते..!

कधीतरी काटेरी धोत्रा अन् त्याच्याशी खेळत असलेल्या त्याच्या पिवळ्या रंगाच्या फुलांशी स्पर्शाची भाषा करून बोलतं व्हायचं,त्याच्या काटेरी विश्वात अलवार,हळुवार जपलेलं मऊपण खूप सहज अनुभवायला मिळते अश्यावेळी.कधीतरी करवंदाच्या जाळ्यांशी बोलायचं त्यांचं हिरवेपण अन् काट्यांचा बोचणारा स्पर्श आपल्याला आयुष्यातील अनेक गणितं  सोडवायला भाग पाडतो..!

त्यामुळं आयुष्यभर किंवा आयुष्याच्या उत्तरार्धात फक्त चालत राहायचं,निसर्गाला जवळ केलं की निसर्ग आपल्याला त्याच्याजवळ करतो अन् मग त्याच्या आत लपलेली असंख्य गुपिते ती आपल्या समोर उघडी करतो.निसर्ग आपल्याला भरभरून देतो फक्त त्याला पात्र आपली कुवत हवी अन् हे पात्र असणं इतकं सहज नसतं,त्यासाठी आयुष्यातील अनेक गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो..!

निसर्गाच्या सान्निध्यात चालत राहिले,भटकत राहिले की आयुष्याला घेऊन केलेल्या अपेक्षांचा आलेख ओझरता होवू लागतो,शून्यातसुद्धा आपण मग समाधानी अन् एक उंचीवरचे आयुष्य जगत असतो.मग निसर्गातील दगड,धोंड्यांची निसर्गाने निर्माण केलेली भाषा आपल्याला उमगायला लागते.नदीचं वाहते पाणी आपल्याशी संवाद करू लागते,कधीतरी आयुष्याला घेऊन अजूनही आपण काही अपेक्षा करतो का..?  हा ही प्रश्न मग ते आपल्याला करू लागते,जेव्हा याचं उत्तर मनालाच नाही असं येतं तेव्हा आयुष्याला घेऊन आपण यशस्वी झालेलो असतो...!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...