मुख्य सामग्रीवर वगळा

धोंडाई..!

धोंडाई..!

आज दै."सकाळ" वृत्तपत्रात "मैफल" या सदरात माझा "धोंडाई" हा ललित लेख "औरंगाबाद शहर" आवृत्तीमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

अवघ्या महाराष्ट्रातुन प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रात जेव्हा आपला लेख प्रसिद्ध होतो आणि दिवसभर आपल्यावर होणारा फोनचा वर्षाव खास करून (ग्रामीण भाग) हे खूप सुखद आहे.आज संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातून बरेच फोन आलेत अन् कुठेतरी अजूनही वृत्तपत्र वाचन आवडीने करतात याची पुन्हा एकदा जाणीव झाली...

मनस्वी खूप धन्यवाद,
Vikas Deshmukh  Sir..!
Sakal Media Group,Aurangabad..!

सुर्य सांजेकडे कलायला लागला तसं रानातल्या लोकांनी घराच्या वाटा धरल्या,जसजसा सुर्य अस्ताला जातो आहे तसतसा पायांचा वेग वाढत आहे.घराची लागलेली ओढ अन् घरी गेल्यावर कधी एकदा कोरा काळा चहा पिऊन पाठ घंटाभर ओसरीला लांब करू असे धोंड्याईला वाटत होतं...

उतरत्या वयात वावरातले बैठे काम आता तिला सहन होत नव्हते पण आले दिवस कसेतरी ढकलायचे अन् चालू शरीराला घास कुटका खाऊन तगते जगते ठेवायचं.
इतकचं काय धोंडाईच्या रोजच्या जगण्यातील दिनक्रम होता...

धोंडाईने रानाचा रस्ता मागं टाकला अन् गावच्या वाटाला धोंडाई लागली,डोक्यावर रस्त्यानं चालता-चालता जमा केलेल्या काटक्यांच पेंडक घेऊन धोंडाई त्याला सावरत चालली होती.
इतक्यात धोंडाईला समिणाबी आपा,अंजुम खाला अन् शांता आक्का भेटली,धोंडाईने सरपनाला सावरत शांत आक्काला पुसले...

अय शांते कुठशिक गेली होती ओ माय कामाला..?
शांता आक्का बोलायला लागली : अगं व माय ते लक्ष्मी आयच्या देऊळा खाल्ल्या रांनची झुंब्रा माळीन हायना तिच्या वावराले गेली होती...
धोंडाई:काय काम करायला गेली होती ओ माय..?
समिणाबी आपा: अरे ओ बुड्डी ओ कपास चुंनने को गयेल थे...
धोंडाई: बरं बरं माय लेकी अंजुम तू  इन्के सोबत गेलती का..?
अंजुम खाला - हां जी बुड्डी घरपे भी क्या करे..?
सलम्या का बुढ्ढा काम को नाहीं जाता,तो खानेको कोण देगा..?
तो करती हू थोडा बहुत...

इतक्यात शांता आक्का बोलायला लागली: मायवं चल जातू गं मलाबी मुसनमान मोहल्यात जायचं हायसा शब्बीर मामु च्या घरला कापुस यचला त्याचं पैकं आणाया...

धोंडाई मारुतीच्या देवळापासून एकटी वाटेनं घराकडे निघाली.
दिवसभर गावात शुकशुकाट असतो पण सांजेच्या वेळेला मात्र गावात जीव लागतो,रस्त्यानं कोणी गाडीवर दुधाची क्यान घेऊन घरला जात होते तर कुणी गाडीबैलात जात होते.
धोंडाई बिच्चारी चालली होती एक एक पाऊल टाकत,दिवस कलला होता अंधारून आलं होतं.

पाटलाचा शिवाज्या मारुतीच्या देवळात दिवा घेऊन चालला होता,सावता माळ्याच्या मंदिरात पाच-सहा धोंडाईच्या पिढीतले म्हातारे हरिपाठ म्हणत बसले होते,त्यातल्या आसऱ्या बाबांनी धोंडाईला आवाज दिला...
अय धोंडाई आज एकटीच का,लेवुक कुठशिक गेला अन् पार बोडक्या बाभळीगत झाली हायसा ते लाकडाचं पेंडक कश्याला घेऊन यु राहिली..

धोंडाई एक नाय का दोन नाय मुकाट्यानं मान हालत तिच्या घराच्या गल्लीने निघुन गेली....

धोंड्याई जात होती तिच्या मार्गाला मी बसलो होतो देवळा महुरच्या पारावर    गावचा येता-जाता माणूस मला ईचारत हुता...
काय छोटे सरकार कौशिक आलासा शहरावरून..?
मी एकच उत्तर देत होतो काल संच्याला.

शिवणामाय भर उन्हाळ्यात ही अजून तुडंब भरुन वाहत होती,यावर्षी पावसाची कृपा म्हणुन गाव खुश होता.माझ्या मनात शहरातले असंख्य प्रश्न होती त्यांना या नदी पात्रात नजर लावून उत्तर शोधत होतो,पूर्वी असलेले शहराचं आकर्षण आता कमी होवू लागलं होतं.पण कुठलाही विलाज नव्हता कारण माझा गाव मला कधीच परका झाला होता,मी बसलो होतो शिवणामायच्या पात्रात डोळे लावून बघत कधीचाच...

धोंड्याई घरला पोहचली अन् डोक्यावरचं पेंडके अंगणात टाकून कटूर्यात पाणी घेऊन अंगणातल्या दगडावर हातपाय धुवत,घासत बसली.हातपाय धुवून देवाला दिवाबत्ती करून धोंड्याईन चूल पेटवली,धगधगता चुलीच्या निखाऱ्याने धोंड्याईला जरा बरं वाटलं...

चुल्हीवर कोरा चहा उकळत होता,साऱ्या घरात त्या कोऱ्या चहाचा सुगंध दरवळत होता...
धोंड्याईन सांडशित पातीले पकडुन ढवळ्या कपात चहा गाळून घेतला,चुल्हीच्या उजेडात एक हाताने बशी सावरत अन् एका हाताने नाकातली लांब झुबक्याची नथ सावरत धोंड्याई चहा पित होती...
चहा पिऊन झाली अन् धोंड्याईने भाकरी थापायला परातीत पीठ घेतलं भाकरी थापायचा आवाज माझ्या बसल्या पारा पहूर येत होता अन् मी त्यात गुंग होवून माझ्या शिवणामायला न्याहाळत बसलो होतो....

Written by,
©® Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...