मुख्य सामग्रीवर वगळा

कॅनव्हास तुझ्या संगतीने..!

कॅनव्हास तुझ्या संगतीने..!

कुंचल्यात कुंचल्यास तू रंगावत राहिली,
झाली जेव्हा एक कुंचल्याची प्रतिमा पूर्ण,
तेव्हा मात्र बदनाम मी झालो..!

कुणाला कसली ओढ तर कुणाला कसली,कुणाला वेळ साधायला आवडते तर कुणाला वेळेनुसार आपलं बदलणं.सांजेचा सूर्य अस्ताला जाण्याच्या काही दहा-पंधरा मिनिटांची ती घटिका अन् ती वेळ तुला साधायला आवडायची...
अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या किरणांनी जसे-जसे मावळतीला जावं,तसं त्या काही मिनिटांत तुझं स्केच बोर्डवर तयार होणारं ते चित्र मी बघत राहावं...

आयुष्यातलं सर्वात सुंदर दृष्य कुठलं असावं तर हेच,तू तुझ्या डोळ्यांवर येणाऱ्या बटांना ब्रश हातात धरलेल्या हातांनी अलगत सावरावं जसं अस्ताला जाणाऱ्या सूर्याने प्रकाशातील सर्व वस्तूंना सावरत आपल्या कवेत घ्यावं...

चित्रात तुझं तल्लीन होणं,लीलया अलवारपणे स्केच बोर्डवर फिरणारा तुझा हात,कल्पनेतील रंगात माखलेला तुझा चेहरा हे सर्व खूप सुंदर आहे...बाहेर अस्ताला जाणारा सूर्य त्याची विविध रूपे दाखवत असतो सोबतीला अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर क्षणाक्षणाला तयार होणारं तुझं हे स्केच...

तुझी दुनिया न्यारीच होती,तुला नको होता कुणी जवळचा हवासा वाटणारा मित्र किंवा मैत्रीण.तुझी दुनिया तू कुंचल्यातून शोधायची,तुला नसायचं भान जेव्हा कुंचल्यात तुझं हरवून जाणं व्हायचं तासंतास.
जसं मला वेळेनुसार बदलणं अन् तुला मात्र तुझ्या विश्वात रममाण राहणं इतकच आवडायचं...

तुझं रोजचं ठरलेलं ते ठरल्या वेळेत पूर्ण होणार एक-एक स्केच.आजही आठवतं अस्ताला सूर्य गेला की तू ते अधुरे राहिलेलं स्केच तसच सोडून द्यायचीस.आपल्या मनाने त्या स्केचचा अर्थ लावून त्याला बोलतं करायची,तुझ्याशी अन् माझ्याशीसुद्धा...
मी तुझ्या वेडेपणात नवखा असल्यामुळं मी ही कधी हो ला नाही म्हंटले नाही आणि हो ला हो करत राहिलो...

साधारण वर्षभरापूर्वी पुन्हा तुझ्या स्टुडिओमध्ये आलेलो,तेव्हाही अन् आजही स्केचसाठी तुझं वेडेपण तितकंच होतं.तुझ्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर अधुऱ्या राहिलेल्या सर्वच स्केचला कुठेतरी पूर्णत्व आलं असे भासले आज. का..?
याला कारणे नव्हते,कदाचित काही गोष्टी पूर्णत्वास गेल्या असाव्यात आपल्या नात्यात आता...

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...