मुख्य सामग्रीवर वगळा

आक्काच्या सुमीच बाळंतपण..!

आक्काच्या सुमीचं बाळंतपण..!

कालच्या दै."सकाळ" वृत्तपत्रात संपूर्ण मराठवाडा आवृत्तीमध्ये "मैफल" या सदरात माझी "आक्काच्या सूमीचं बाळंतपण" ही कथा प्रसिद्ध झाली आहे..!

मनस्वी खूप खूप धन्यवाद..!
Vikas Deshmukh सर,
दै.सकाळ मिडिया समुह,औरंगाबाद..!

शीर्षक:आक्काच्या सुमीचं बाळंतपण..!

थंडीचे दिवस सुरू होवून महिना-दोन महिने उलटले होते आणि आता कडाक्याची थंडी रातच्याला जाणवायला लागली होती.गावात सांच्याला जागोजागी शेकोट्या पेटवल्या जात होत्या,सांज सरायला लागली की थंडीचे शरीराला बोचण्याचे काम सुरू होत असायचं....

दिवसभर राखोळीला असलेल्या गावातल्या बकऱ्यांना वळून-वळून मी दमून गेलो होतो.सांच्याला बकऱ्या दावणीला बांधून,मोरीत म्या हातपाय धुतले अन् एकाकीच थंडीमुळे मला हुडहुडी भरून आली.मायना चुल्हीवर कोरा चहा उकळायला ठेवला होता,अंगात हुडहुडी भरून आल्यानं मी चुल्हीपाशी जावून तिच्या लालबुंध झालेल्या निखाऱ्याला ताटलीनं अलिकडं ओढून शेकत बसलो होतो..!

कडाक्याच्या थंडीमुळे चुल्हीजवळ छान वाटत होत,मायच्या भाकरी थापून झाल्या होत्या,पिठलं चुल्हीच्या एकांगाला रटारट आळत होतं,चहा उकळली अन् म्या ती सांडशित धरून गिल्लासामधी वतून पिवून घेतली अन् सावता माळ्याच्या देऊळापहूर असलेल्या पारावर जावून सवंगडीच्या संगतीने गप्पा झोडीत बसलो..!

काही घटकाभरच्याने येऊन मायना अन् म्या जेवण केलं अन् मोहरच्या अंगणात माय भांडी घासत बसली होती.शेजारच्या आक्काचे सांजेचं सगळी काम उरकली होती की काय म्हणून ती मायजवळ येऊन तिच्याशी गप्पा झोडीत बसली होती..!

मी जेवण करून थंडी असल्यानं चुल्हीच्या विझनार्‍या निखाऱ्याशी शेकत,खुप वेळापासून त्या चुलीच्या निखाऱ्याशी काडीनं खेळत बसलो होतो.माय भांडे ठेवायचं टोपलं घ्यायला आत आली,मला बघून ती बोलती झाल,येड्या खुळ्यागत इस्तवाशी काय खेळतोय..?
मी मग्न होतो विचारांमध्ये माझ्या..!
का..? तर विस्तवच माझ्या जगण्याचं वास्तव होतं,म्हणून कधी त्याची भिती नाही वाटली..!

आई पुन्हा घासलेले भांडे टोपल्यात ठेवून भांडे आत ठेऊन आक्काशी गप्पा मारायला बाहेर मोहरच्या अंगणात गेली.मी पण माझा विस्तवाचा खेळ बंद करून,चुल्हीला विझवून आता परसदारच्या अंगणात खाटेवर येऊन अंगावर पांघरून घेऊन झोपलो होतो.थंडी खुप वाजत होती,घरावरची पत्र सकाळच्या प्रहरी पडणाऱ्या दवांनी सादळली होती,गारठ्यानं ती अजुनच गारठून गेली होती,मातीने पोचारलेलं घर अजूनच गारठा धरत होतं..!

मी आता पहुडलो होतो,परसदरच्या मायच्या अन् आक्काच्या गप्पा कानी पडत होत्या.आक्का म्हणत होती,सुमी बाळंतपणाला (तिची लेक) येतिय्या,कालच्याला तिला आठवा महिना सरला होता.ती चार-पाच रोजा पहूर बाळंतपणाला माहेरी येणार  हुती..!

आक्काचा नवरा मरून एक साल झालं होत अन् आता तिची लेक सुमी बाळंतपणाला तिच्याकडं येणार हुती.तिच्या बाळंतपणाची आक्काला चिंता नव्हती,चिंता होती ती आता तिला अन् बाळाला झोपायला लाकडी खाट करायची होती,ती कुणाकडून करून घ्यायाची हे तिला उमगत नव्हतं,ती मायला या बाबत विचारपुस करू लागली हुती...!
म्या ते ऐकत खाटेवर लोळत पडलो होतो..!

खाट तयार केली तर ती विणायला तिला येईना झाली होती, याचं संमध टेन्शन आक्काच्या चेहऱ्यावर दिसत हुतं.उद्या लेक बाळंतीण झाली अन् जावई लेकराला पाहायला आला,खाट नसली तर त्यो काय म्हणल,त्यो मला झिडक्या देईल..!
तुझ्या मायला काय खाट करायला झापली नाही काय..!
असं बोल सुमीच्या लागून मला देईल..

 पैका असतांनाही आक्काची अवस्था खूप वाईट झाली हुती,कारण बाहेरची दुनिया आक्काच्या ओळखीची नव्हती अन् विधवा बाई म्हंटलं की लोकांना फक्त एक संधी वाटते.आक्काच्या मनात विचारांचं काहूर माजलं होते..!

वेळ फार झाली,माझेही पाय दिवसभर रानात शेपुड्यामागे हिंडून-हिंडून दुःखत होते,आता डोळे लागायला लागले होते.आक्का अन् माय हरिपाठ घेऊन आक्का तिच्या घरला झोपायला गेली अन् माय कडीकोंडा लावून आत झोपायला आली.एरवी मी पण झोपी गेलो हुतो,मायना माझ्या अंगावर पुन्हा पांघरून टाकलं अन् माय धरणीला अंथरूण टाकून झोपली..!

झोपल्या-झोपल्या माय काहीतरी पुटपुट करत होती,तिला पण तिच्या लेकीच बाळंतपण आठवलं असावं.तिची तिच्या लेकीच्या बाळंतपणाला खाटीसाठी झालेली फजिती मायला आठवत होती,ते सर्व आठवून माय टिपूस गाळत होती..!

पहाठी मी लवकरच उठलो,बकऱ्यांची पिल्लं प्यायला सोडली अन् मधल्या दाराच्या चौकटीवर बसून मायला बोलो..!
मायव सुमीच्या बाळंतपणाला आपली ही खाट आक्काला दे,गरीब हाय बिच्चारी आक्का..!
आई माझ्याकडे निरखून पाहायला लागली..!
मी पुन्हा बोलता झालो,मायव ताईच्या बाळंतपणाला खाटीसाठी झालेली तुझी आबळ याद हाय मला..!
रातच्याला म्या तुमचं बोलणं ऐकलं,देऊन टाक माय आक्काला आपली खाट..!

माय माझ्याकडं बघून बोलू लागली गरीबीच्या जगरहाटीत जगायला शिकलं माझं कोकरू अन् नकळत मायच्या डोळ्यांतून अश्रुंनी मोकळ्या वाटा करून दिल्या,मायला बघून मला गलबलून आलं अन् तिला पाहून मी पण आसवांचा बांध फोडला,माय मला छातीशी घट्ट कवटाळून रडायला लागली.
तिचा लेक शहाणा झाला याची तिला जाणीव झाली होती अन् तो आनंद तिच्या या आसवांतून ओसंडून वाहत होता..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...